Ravichandran Ashwin to join India squad : टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिसऱ्या दिवशी अचानक चेन्नईला परतलेला रविचंद्रन अश्विन आज पुन्हा संघात दाखल होणार आहे. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे. इंग्लंडसाठी ही वाईट बातमी आहे. अश्विन नसताना इंग्लिश संघाने शनिवारी उर्वरित आठ विकेट ११२ धावांत गमावल्या होत्य. अशा स्थितीत अश्विनसारख्या चॅम्पियन गोलंदाजाच्या पुनरागमनामुळे इंग्लिश कॅम्प नक्कीच अडचणीत येईल. त्याच्या आगमनाने भारताची फलंदाजीही मजबूत होणार आहे.

बीसीसीआयने सांगितले की, अश्विन आणि संघ व्यवस्थापन या दोघांनीही पुष्टी केली आहे की तो चौथ्या दिवसापासून खेळात परतेल. तसेच चालू असलेल्या कसोटी सामन्यात संघासाठी योगदान देत राहील. संघ व्यवस्थापन, खेळाडू, मीडिया आणि चाहत्यांनी खूप समजूतदारपणा आणि सहानुभूती दाखवली आहे आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आणि महत्त्वाचा आदर केला आहे. या आव्हानात्मक काळात संघ आणि त्यांचे चाहते अश्विनच्या पाठीशी उभे राहिले. आता मैदानावर त्याचे पुनरागमन होणार असल्याने सर्वांना आनंद होत आहे. बीसीसीआयने असेही म्हटले आहे की अश्विन आणि त्याच्या कुटुंबाने गोपनीयतेची विनंती केली. आहे. कारण ते या आव्हानात्मक काळातून जात आहेत.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : शुबमन गिल शतकाच्या उंबरठ्यावर रनआऊट, अवघ्या ‘इतक्या’ धावांनी हुकले शतक

अश्विन शुक्रवारी घरी परतला होता –

कौटुंबिक कारणामुळे अश्विनने शुक्रवारी तिसऱ्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या काही तासांपूर्वीच तो अनिल कुंबळेनंतर ५०० कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शनिवारी या घटनेची माहिती दिली होती. त्यांनी अश्विनची आई आजारी असल्याचे सांगितले होते.