Suryakumar Yadav equaled Rohit Sharma’s record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताचा स्थायी कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने तिसऱ्या सामन्यात वादळी शतक झळकावले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने प्रोटीस गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने दमदार फटकेबाजी करताना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. त्याचबरोबर रोहित शर्माच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले पहिले शतक –

सूर्यकुमार यादवने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे या स्वरूपातील हे त्याचे पहिले शतक होते आणि या संघाविरुद्धची ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने पहिले आपले अर्धशतक ३२ चेंडूत पूर्ण केले आणि या दरम्यान त्याने ५ षटकार आणि २ चौकार मारले, तर त्याने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ७ चौकार मारले. मात्र, शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

हेही वाचा – Kidney Disease : ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जीवन-मरणाची लढतोय लढाई, डॉक्टरांनी वर केले आहेत हात

रोहित शर्माच्या विक्रमाशी साधली बरोबरी –

भारतासाठी आतापर्यंत टी-२० मध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज रोहित शर्मा होता. त्याने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी ४ शतके झळकावली होती, परंतु आता सूर्यकुमार यादवने त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता त्याच्या नावावर एकूण ४ शतके आहेत. सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये चार वेगवेगळ्या देशांविरुद्ध शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. याशिवाय कर्णधार म्हणून भारतासाठी टी-२० मध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. याआधी, रोहित शर्माने भारतासाठी कर्णधार म्हणून टी-२० मध्ये दोन शतके झळकावली आहे. तसेच कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचे हे पहिले शतक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला दिले २०२ धावांचे लक्ष्य –

तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ७गडी गमावून २०१ धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही ६० धावांची शानदार खेळी केली. रिंकू सिंगने १४ आणि शुबमन गिलने १२ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या सामन्यात तिलक वर्मा फ्लॉप ठरला. या सामन्यात तिलक वर्मा खाते न उघडता बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज आणि विल्यम्सने प्रत्येकी २ गडी बाद केले. या सामन्यात केशव महाराजने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले.