ICC T20 World Cup 2022 Semifinal, India vs England: टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमधील दुसरा सामना आज अ‍ॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान उपांत्यफेरीचा दुसरा सामना खेळवला जाणार असून विजेता संघ अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सुपर-१२ च्या फेरीमध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना तब्बल ७१ धावांनी जिंकत अगदी दिमाखात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला.

भारताने दिलेलं १८७ धावांचं आव्हान झिम्बाब्वेच्या फलंदाजांना झेपलं नाही आणि संपूर्ण संघ २० षटकांचा खेळ पूर्ण करण्याआधीच ११५ धावांवर तंबूत परतला. या विजयासहीत भारताने दुसऱ्या गटात अव्वल स्थान कायम राखत प्रवेश केल्याने उपांत्य फेरीमध्ये भारत इंग्लंविरोधात मैदानात उतरणार आहे. भारत इंग्लंडविरोधात खेळणार असून भारताचा इंग्लंविरोधातील रेकॉर्ड फारच उत्तम असल्याचं चित्र दिसत आहे.

पाकिस्तान अंतिम सामन्यात
बुधवारी झालेल्या टी-२० विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला सात गडी राखून पराभूत केलं. पाकिस्तानने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडने दिलेलं १५३ धावांचं लक्ष्य सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. पाकिस्तान हा अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध १३ तारखेला मेलबर्न क्रिकेट मैदानावर अंतिम सामना खेळणार आहे.

नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत विरुद्ध इंग्लंडची आकडेवारी काय सांगते? कोणाचं पारडं जड?
भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान टी-२० चे २२ सामने झाले असून त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने भारताने जिंकले आहेत. इंग्लंड आणि भारतादरम्यान झालेल्या तीन टी-२० विश्वचषक सामन्यांपैकी एकामध्ये इंग्लडने विजय मिळवला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या वर्षीच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये भारत आपलं वर्चस्व कायम राखणार की इंग्लंड भारताला धक्का देणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.