ऑक्टोबर महिन्यात ओमानमधील मस्कतमध्ये रंगणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा भिडणार आहेत. १८ ते २८ ऑक्टोबरदरम्यान मस्कतमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मस्कतमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय आणि पाकिस्तानी लोक कामासाठी स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे या सामन्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
अवश्य वाचा – Union Budget 2018 – अर्थमंत्री अरुण जेटलींकडून भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी २१९६ कोटी रुपयांची तरतूद
२०११ साली आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेची सुरुवात झाली होती. यादरम्यान ओमानला पहिल्यांदाच या स्पर्धेचं यजमानपद भूषवण्याचा मान मिळालेला आहे. २०१६ साली मलेशियात खेळवल्या गेलेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-२ अशी मात केली होती. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि ओमान हे संघ सहभागी होणार आहे. यजमान देश या नात्याने ओमानला या स्पर्धेत सहभाग देण्यात आला आहे.
सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारे क्रीडा सामने होत नाहीयेत. अशावेळी मस्कतमध्ये होणारा हा सामना क्रीडा चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. २०१७ साली बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या आशिया चषकातील भारत-पाक सामन्याला चांगला प्रेक्षकवर्ग मिळाला होता. त्यामुळे आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.