केंद्र शासनाने आवश्यक असणारी हमी दिल्यामुळे २०१७च्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनासाठी भारतातर्फे लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या प्रस्तावाची मुदत लवकरच संपत असून शासनाकडून हमी न आल्यामुळे भारताच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र शासनाने ही हमी दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडे (फिफा) रीतसर प्रस्ताव पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्पर्धेचे प्रायोजक, प्रसारमाध्यमे, विदेश विनिमय, सुरक्षा व्यवस्था, खेळाडूंची वाहन व निवास व्यवस्था, व्हिसा आदी व्यवस्थांबाबत शासनाकडून या प्रस्तावासोबत काही कागदपत्रे पाठवावी लागतात. ही सर्व कागदपत्रे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे उपलब्ध झाली आहेत त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे (एआयएफएफ) फिफाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे, असे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिका, आर्यलड व उझबेकिस्तान यांनी यापूर्वीच या स्पर्धेच्या संयोजनपदाचे प्रस्ताव पाठविले आहेत.