नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासात, पर्यायाने भारतीय क्रीडाक्षेत्रात सोमवारी एक नवा अध्याय जोडला गेला. या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघ खेळताना दिसतील. भारताच्या टेबल टेनिस संघांना प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात यश आले आहे.
जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धा ही टेबल टेनिसच्या ऑलिम्पिक प्रवेशाची अखेरची संधी होती. त्यानंतरही ऑलिम्पिकसाठी सात संघ निश्चित व्हायचे बाकी होते. हे संघ जागतिक टेबल टेनिस महासंघाच्या अंतिम क्रमवारीनंतर सोमवारी निश्चित झाले.
हेही वाचा >>>महेंद्रसिंह धोनी लवकरच नव्या भूमिकेत, एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण! निवृत्तीचा निर्णय घेणार?
बुसान येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले आठ संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र, दोन्ही संघांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. उपउपांत्यपूर्व फेरीत पुरुष संघाला कोरियाकडून ०-३ आणि महिला संघाला तैपेइकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या स्पर्धेतील कामगिरीमुळे क्रमवारीत सुधारणा झाल्याने भारतीय टेबल टेनिस संघ ऑलिम्पिक पात्र ठरू शकतात हे निश्चित होते. त्या निर्णयावर नियमानुसार सोमवारी शिक्कामोर्तब झाले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता टेबल टेनिसमध्ये पाच पदकांचा निर्णय होईल. यात पुरुष आणि महिला एकेरी यासह पुरुष, महिला सांघिक व मिश्र दुहेरी अशा पाच विभागात ऑलिम्पिक लढती होतील. या सर्व लढती बाद फेरी पद्धतीने होणार आहेत. या स्पर्धा साऊथ पॅरिस अरिना येथे २७ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होतील.
भारतीय टेबल टेनिस संघांना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अखेर यश आलेच. या क्षणाची अनेक वर्षांपासून वाट पाहत होतो. वैयक्तिक गटात मी आतापर्यंत पाच ऑलिम्पिक खेळलो असलो, तरी संघ म्हणून भारत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे महिला संघही पात्र ठरला. – शरथ कमल, भारताचा टेबल टेनिसपटू