मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव भासत असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातील पराभवानंतर म्हणाली. भारतीय महिला संघाकडे पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक नाही. माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठवण्यात आले असून ऋषिकेश कानिटकरकडे फलंदाजी प्रशिक्षकापदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधीच शिल्लक आहे. त्यामुळे भारताला लवकरच गोलंदाजी प्रशिक्षक निवडावे लागतील.

‘‘आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची कमतरता जाणवत आहे, तरीही आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्या आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने समजून घेत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यासाठी त्यांनी स्वत: रणनीती तयार केली. मी मैदानात त्यांना साथ देण्याचे काम करते,’’ असे हरमनप्रीतने सांगितले. पूजा वस्त्रकारच्या दुखापतीचा फटका भारताला बसला आहे. याबाबत हरमनप्रीत म्हणाली की,‘‘ आम्हाला पूजाची कमतरता जाणवत आहे. आम्हाला या खेळपट्टीवर मध्यमगती गोलंदाजाची आवश्यकता होती आणि सामन्यातील अखेरची षटके टाकण्याचाही अनुभव तिच्याकडे आहे. आम्ही सुरुवातीच्या दोन सामन्यांत मेघनाला संधी दिली, पण हा प्रयोग यशस्वी ठरला नाही.’’