घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघावर ४० धावांनी मात करत मुंबई इंडियन्स, बाराव्य हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या १६९ धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने दिल्लीच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र राहुल चहरने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. धवन आणि पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या आक्रमणाची धार धारदार करत दिल्लीचा बॅकफूटला ढकललं. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो हे फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत. अखेरच्या फळीत अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दिल्लीसमोरचं आव्हान हे अशक्यप्राय अवस्थेत गेलं होतं. अखेरीस मुंबईने धावांनी विजय मिळवत गुणतालिकेतलं दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. मुंबईकडून राहुल चहरने ३, जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. त्यांना लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने १-१ बळी घेत चांगली साथ दिली. त्याआधी, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सला १६८ धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा उलटला. चांगली सुरुवात झाल्यानंतरही, मधल्या फळीत भागीदारी न होऊ शकल्यामुळे मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असं वाटत असतानाच अमित मिश्राने रोहितचा त्रिफळा उडवला. या खेळीदरम्यान रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित माघारी परतल्यानंतर बेन कटिंगही लवकर माघारी परतला. यानंतर फलंदाजांनी मैदानात तळ ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी रचण्यात त्यांना अपयश आलं. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत मुंबईला धावांचं आव्हान गाठून दिलं. दिल्लीकडून कगिसो रबाडाने २ तर अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी १-१ बळी घेतला.