आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात काल रात्री रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान पंचांच्या एका निर्णयावरुन चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी चांगलाच संतापला. धोनी हा सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांना ‘कॅप्टन कूल’ या नावाने परिचीत असला तरी त्याचं वेगळचं रुप चाहत्यांना पहायला मिळालं. धोनीने बाद झाल्यानंतर नो बॉलवरुन झालेल्या वादावरुन थेट डगाऊटमधून मैदानात येत पंचाशी वाद घातला. या प्रसंगानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले असून काहींनी धोनीचे समर्थन केले आहे तर काहींनी धोनीला धारेवर धरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनीने अशाप्रकारे मैदानात येऊन पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेणे खेळ भावनेच्या विरोधात असल्याचे मत अनेकांनी ट्विटवरुन नोंदवले. तर दुसरीकडे धोनीने चूक दाखवण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे त्याचे समर्थक म्हणत आहेत. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपली भूमिका स्पष्ट केली असती तरी धोनीच्या वागण्यावरुन नेटकऱ्यांमध्ये दुमत असल्याचे चित्र दिसत आहे. याच संदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाइन’नेही फेसबुक आणि ट्विटवर एक पोल घेतला असून त्यामध्ये तुम्ही तुमचे मत नोंदवू शकता. ‘धोनीने मैदानात येऊन पंचांशी वाद घालणं, हे वर्तन योग्य वाटतं का?’ या प्रश्नावर तुम्ही फेसबुक तसेच ट्विटवर आपले मत मांडू शकता.

नक्की वाचा: IPL 2019 : पंचांनी नो-बॉलचा निर्णय रद्द केला, धोनीने मैदानात राडा केला

थेट फेसबुकवर मत मांडण्यासाठी येथे क्लिक करा

थेट ट्विटवर मत मांडण्यासाठी येथे क्लिक करा

नक्की वाचा >> IPL 2019: मैदानात पंचांबरोबर वाद घातल्याने धोनी अडचणीत, आयपीएलने केली ही कारवाई

काय झाले नक्की मैदानात

अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, मधल्या चेंडूवर पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. मात्र यानंतर दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी तो चेंडू नो-बॉल नसल्याचं जाहीर केलं. यावेळी मैदानात दोन्ही पंचांमध्ये प्रचंड सावळागोंधळ पहायला मिळाला. हा सर्व प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या धोनीचा सर्व संयम गळून पडला आणि त्याने मैदानात येऊन पंचांसोबत राडा केला.

पंच उल्हास गंधे यांनी बेन स्टोक्सने टाकलेला फुलटॉस चेंडू नो-बॉल असल्याचं घोषित केलं. मात्र दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी हा चेंडू नो-बॉल नसल्याचं म्हटलं. मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा हा अवतार त्याच्या चाहत्यांसाठी नवीनच होता.

आयपीएलने केली कारवाई

धोनीला आता या वादाचे परिणाम भोगावे लागणार असून आयपीएलने या प्रकरणी धोनीवर कारवाई केली आहे. या सामन्यासाठी धोनीला मानधनाच्या ५० टक्के रक्कमच देण्यात येणार असून मैदानात येऊन नियम मोडल्याप्रकरणी त्याचे ५० टक्के मानधन कापले जाणार आहे. यासंदर्भात आयपीएलकडून रात्री उशीरा एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे.

‘जयपूरमधील राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चेन्नई सुपकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामन्याच्या मानधानापैकी ५० टक्के रक्कमेचा दंड केला जात आहे. आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे धोनीने लेव्ह दोनमधील २.२० या नियमांमध्ये बसणारी चूक केली असून त्याने ती मान्य केली आहे.’

आयपीएलच्या २.२० नियमामुसार खेळ भावनेला धक्का पोहचवणाऱ्या खेळाडूवर कारवाई करण्यात येते. धोनीला करण्यात आलेला ५० टक्के मानधनाचा दंड हा लेव्ह टू च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिल्यांदा दोषी अढळल्यास करण्यात येणारा कमाल स्वरुपातील दंड आहे. मात्र जारी केलेल्या पत्रकामध्ये धोनीने नक्की कशाप्रकारे या नियमांचे उल्लंघन केले यासंदर्भातील कोणतीही माहिती आयपीएलकडून देण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 loksatta poll was ms dhoni right in walking to argue with the umpires
First published on: 12-04-2019 at 09:41 IST