आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ आता युएईत दाखल झाले आहेत. करोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता युएईत सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची राहण्यासाठी वेगळी सोय केली आहे. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे हा यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. Player Transfer Window अंतर्गत राजस्थान रॉयल्सने अजिंक्यला दिल्लीच्या ताफ्यात दिलं आहे. परंतू यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघात संधी मिळवण्यासाठी अजिंक्यला मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं चित्र आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्यला संघात स्थान मिळेल का अशी चर्चा सुरु आहे.

आयपीएलमध्ये अजिंक्यने अनेकदा डावाची सुरुवात केली आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्सचं संघ प्रशासन शिखर आणि पृथ्वीची जोडी तोडण्याचं धाडस करणार नाहीत. अशा परिस्थितीत अजिंक्यने संघात मधल्या फळीत खेळून फिनीशरचा रोल निभावण्याची तयारी दर्शवली आहे. “संघात माझी भूमिका नेमकी काय असेल हे आताच सांगता येणार नाही. त्यासाठी आमचा सराव सुरु व्हायला हवा. यानंतरच चर्चेला सुरुवात होईल. मी माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत सलामीला आलो आहे. पण दिल्लीत मी कुठे फलंदाजीला यावं हा संपूर्णपणे प्रशासनाचा निर्णय आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी येईल ती मी १०० टक्के पूर्ण करेन. गरज पडल्यास संघात पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही मी तयार आहे.” अजिंक्य पीटीआयशी बोलत होता.

अवश्य पाहा – CSK चा स्वदेशीचा नारा, युएईत ताज हॉटेलमध्ये थांबणार संघ

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाची स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. RCB आणि पंजाबप्रमाणे दिल्लीचा संघही आतापर्यंत आयपीएलचं जेतेपद मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा तरुण संघ यंदाच्या स्पर्धेत काही चमत्कार करुन दाखवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराटचा भार फिंच, डिव्हीलियर्स कमी करु शकतात !