मुल्लानपूर (चंडीगड)

अडखळत्या सुरुवातीनंतर स्थिरावलेला मुंबई इंडियन्स आणि दमदार सुरुवातीनंतर गेल्या काही सामन्यांत लय गमावून बसलेला गुजरात टायटन्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, शुक्रवारी ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात एकमेकांसमोर येणार आहे. मुंबईला पाच जेतेपदांचा अनुभव असून गुजरात संघाने एकदाच ‘आयपीएल’ करंडक उंचावला आहे. मुंबई संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांसारख्या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. आता हा अनुभव मुंबईसाठी निर्णायक ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

गुजरात संघाचे चार वर्षांपूर्वी ‘आयपीएल’मध्ये पदार्पण झाले. पहिल्या दोन हंगामांत हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवले. मात्र, त्यानंतर हार्दिकने गुजरात संघ सोडून मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला. मग गुजरात संघाच्या नेतृत्वाची धुरा शुभमन गिलकडे सोपविण्यात आली. गेल्या हंगामात गुजरात संघाला ‘प्ले-ऑफ’ गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळे गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ यंदा प्रथमच ‘प्ले-ऑफ’मध्ये खेळणार आहे.

कर्णधार म्हणून गिल हे दडपण कसे हाताळतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. गुजरातच्या संघाने यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात करताना गुणतालिकेत अग्रस्थानासाठी दावेदारी उपस्थित केली होती. ‘अव्वल दोन’ स्थानांवरील संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. मात्र, गुजरातच्या संघाने मोक्याच्या क्षणी निराशा केली. अखेरच्या दोन साखळी सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने गुजरातची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. त्यामुळे त्यांना आता ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात खेळावे लागणार आहे.

दुसरीकडे, मुंबईच्या संघाला पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत हार पत्करावी लागली होती. मात्र, त्यानंतर या संघाने खेळ उंचावताना उर्वरित नऊपैकी सात सामन्यांत विजय मिळवत ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला. मुंबईचा संघ विक्रमी सहाव्या ‘आयपीएल’ जेतेपदासाठी प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी उर्वरित तीन सामने ‘करो या मरो’चे असणार आहे. हे दडपण हाताळण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी अनुभवी खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरेल. गतहंगामात रोहितच्या जागी हार्दिकची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. मुंबईचा हा निर्णय चाहत्यांना फारसा आवडला नाही. परंतु त्यानंतर भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करत हार्दिकने चाहत्यांचे प्रेम पुन्हा मिळवले. आता मुंबईला यश मिळवून देत चाहत्यांच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याची हार्दिककडे संधी आहे.

विजय अनिवार्य

‘एलिमिनेटर’च्या सामन्यात दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य असेल. पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान थेट संपुष्टात येईल, तर विजयी संघ ‘क्वालिफायर-२’ सामन्यात खेळेल.

ऑरेंज कॅपसाठी चुरस…

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणाऱ्या ‘ऑरेंज कॅप’साठी यंदा मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील खेळाडूंमध्ये चुरस आहे. या शर्यतीत गुजरातचे साई सुदर्शन (६७९ धावा) आणि शुभमन गिल (६४९) अव्वल दोन स्थानांवर, तर मुंबईचा सूर्यकुमार यादव (६४०) तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमारने गेल्या दोन सामन्यांत अर्धशतके साकारली असून यंदाच्या हंगामात सर्व साखळी सामन्यांत किमान २५ धावांचा टप्पा ओलांडण्याची किमयाही त्याने साधली आहे. त्यामुळे त्याला रोखणे हेच गुजरातसमोरील मोठे आव्हान असेल.

बदली खेळाडूंवर जबाबदारी

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ‘आयपीएल’ एक आठवडा लांबल्याचा मुंबई आणि गुजरात या दोनही संघांना फटका बसला आहे. मुंबईचे रायन रिकल्टन, विल जॅक्स आणि कॉर्बिन बॉश, तर गुजरातचे जोस बटलर आणि कगिसो रबाडा हे खेळाडू राष्ट्रीय संघांकडून खेळण्यासाठी मायदेशी परतले आहेत. त्यांच्या जागी मुंबईने जॉनी बेअरस्टो, चरिथ असलंका आणि रिचर्ड ग्लीसन, तर गुजरातने कुसाल मेंडिसला करारबद्ध केले. या बदली खेळाडूंवरही आता जबाबदारी असणार आहे. मुंबईसाठी रोहित शर्माच्या साथीने इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज बेअरस्टो सलामीला येणे अपेक्षित आहे. गुजरातसाठी मेंडिस तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.