भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान डीआरएसमधील अंपायर्स कॉलबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही यासंबधित मुद्दा उपस्थित केला होता. आयसीसीने आता डीआरएसमध्ये काही गोष्टी बदलल्या आहेत, पण अंपायर्स कॉल कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिसऱ्या पंचांना डीआरएसच्या बाबतीत काही अधिकार मिळाले आहेत.

अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट समितीने अंपायर्स कॉलला महत्त्व देत पंचांचा निर्णय कायम ठेवला आहे. कुंबळे म्हणाल. की, डीआरएस म्हणजे मोठ्या चुका दुरुस्त करणे.

डीआरएस आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयामध्ये तीन बदल

यावेळी क्रिकेट समितीने तीन बदलांना मान्यता दिली आहे. पहिला बदल असा की, विकेट झोनची उंची स्टंपच्या वरच्या बाजूला वाढविण्यात आली. यामुळे विकेटची उंची आणि रुंदी अशा दोन्ही स्वरुपात अंपायर्स कॉल समान राहील. दुसरा बदल असा आहे की, एलबीडब्ल्यूचा आढावा घेण्यापूर्वी, फलंदाजाने चेंडू योग्यरित्या खेळण्याचा प्रयत्न केला आहे की नाही, हे विचारण्यासाठी खेळाडू पंचांशी बोलू शकतात.

तिसर्‍या आणि शेवटच्या बदलामध्ये तिसऱ्या पंचाला अधिकार मिळाला आहे. यात तिसरा पंच शॉर्ट रनच्या बाबतीत निर्णय देऊ शकणार आहे. या तीन नियमांना आयसीसीने मान्यता दिली आहे.

अंपायर्स कॉल कायम ठेवण्याच्या उद्देशाने असे सांगितले गेले आहे की, मैदानावर उभ्या असलेल्या पंचांच्या निर्णयाचा अंतिम विचार केला पाहिजे. कोणत्याही मोठ्या चुकांसाठी डीआरएसचा वापर करून त्या सुधारल्या जाऊ शकतात, परंतु अंपायर्स कॉल मोठ्या चुकीमध्ये समाविष्ट केलेला नाही. मागील काही काळात अंपायर्स कॉल विषयी बरेच प्रश्न निर्माण झाले, पण त्यात कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही.