चेन्नई सुपरकिंग्ज संघातील दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना झालेली करोनाची लागण यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नाही. चेन्नईच्या संघातील खेळाडूंना करोनाची लागण झालेली पाहून यंदाच्या हंगामात सलामीच्या सामन्यातून चेन्नईचा पत्ता कट होऊन विराट कोहलीच्या RCB संघाला संधी मिळण्याचे संकेत मिळत होते. परंतू India Today ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय ठरवल्याप्रमाणे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना आयोजित करण्याची तयारी करत आहे.

१९ सप्टेंबरपासून युएईत स्पर्धेला सुरुवात होईपर्यंत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईल असा बीसीसीआयला अंदाज आहे. शनिवारी स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली आहे. दुबई, शारजाह आणि अबुधाबी अशा तीन शहरांमध्ये यंदाच्या हंगामाचे सामने खेळवले जाणार आहेत.

दरम्यान संघातील दोन खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला होता. परंतू शुक्रवारपासून चेन्नईचे खेळाडू सरावाला सुरुवात करणार असल्याचं समजतंय. तसेच चेन्नईच्या संघ व्यवस्थापनानेही सलामीचा सामना खेळण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे बीसीसीआय स्पर्धेचं वेळापत्रक कधी जाहीर करतंय याची क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहे.