इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग सहाव्या पराभवाचं तोंड पहावं लागल्याने रोहितचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये (IPL 2022 Points Table) तळाची जागा टिकून असल्याचं निराशाजनक चित्र चाहत्यांना अजून पुढच्या सामन्यापर्यंत तरी पहावं लागणार आहे.. आज मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये मुंबईला लखनऊ सुपर जयंट्सच्या संघाने १८ धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे मुंबईवर पहिल्यांदाच सलग सहा सामन्यांमध्ये पराभूत झाल्याची नामुष्की ओढावली आहे. आजच्या पराभवामुळे मुंबईची प्ले ऑफच्या फेरीत जाण्याची शक्यता अजून धूसर झाली आहे. मात्र मुंबईच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब एकच आहे की प्ले ऑफची दारं मुंबईच्या संघासाठी पूर्णपणे बंद झालेली नाहीत.

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊच्या संघाने दिलेलं २०० धावांचं आव्हान मुंबईला जड गेलं आणि मुंबईचा १८ धावांनी पराभव झाला. या मुंबईचा यंदाच्या पर्वातील सलग सहावा पराभव आहे. मुंबईचा संघ सध्या पॉइण्ट टेबलमध्ये (IPL 2022 Points Table) तळाशी आहे. मुंबईने यापूर्वी इतकी वाईट कामगिरी कधीच केली नव्हती. त्यामुळेच या वाईट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आता पाच वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबईचा दादा संघ यंदा प्ले ऑफच्याआधीच बाहेर पडतो की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे. सध्या मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो की नाही याबद्दल सुरु झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा.

मुंबई पॉइण्ट टेबलमध्ये तळाशी
मुंबई इंडियन्स हा या पर्वामधील असा एकमेव संघ आहे ज्याला अद्याप एकही विजय मिळवता आलेले नाही. सहापैकी सहा सामन्यांमध्ये पराभव झाल्याने मुंबई पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. ७० सामन्यांच्या साखळी फेरीमधील मुंबई विरुद्ध लखनऊ या २६ व्या सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबल पाहिलं तर गुजरात आणि लखनऊ हे पहिल्यांदाच आयपीएल खेळणारे संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. गुजरातने पाच पैकी चार तर लखनऊने सहा पैकी चार सामने जिंकलेत.

या दोन नवख्या संघाच्या खालोखाल राजस्थान आणि पंजाबचे संघ अनुक्रमे तिसऱ्या वर चौथ्या स्थानी आहेत. त्यांनी प्रत्येकी पाच सामने खेळून त्यापैकी तीन तीन सामने जिंकल्याने त्याच्या खात्यावर सहा गुण आहेत. कोलकात्याचा संघ सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकलाय तर तीन पराभूत झालाय. सहा गुणांसहीत हा संघ पाचव्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पाचपैकी तीन सामने जिंकले असून दोनमध्ये त्यांचा पराभव झाल्याने ते सहा गुणांसहीत सहाव्या स्थानी आहेत. हैदराबादचा संघसंही आरसीबीप्रमाणे पाचपैकी तीन सामने जिंकून सहा गुणासहीत सातव्या स्थानी आहे. दिल्लीचा संघ चारपैकी दोन सामने जिंकून आठव्या तर चेन्नईचा संघ पाच पैकी १ सामना जिंकून नवव्या स्थानी आहे.

अव्वल चारमध्ये स्थान मिळणं कठीण…
आता मुंबईच्या प्ले ऑफबद्दलच्या संधीबद्दल बोलायचं झालं तर मुंबईला चत्मकारच करावा लागेल. यापूर्वीही मुंबईने अशापद्धतीचे चमत्कार करत प्ले ऑफमध्ये धडक मारल्याने चाहत्यांना रोहितच्या संघाकडून अपेक्षा कायम आहेत. मात्र या चमत्काराची वाट पाहणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांसाठी आताच्या स्थितीला एक आनंदाची आणि वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी की असाच चमत्कार मुंबईने २०१५ मध्ये करुन दाखवला होता. तर वाईट बातमी अशी की आताचं आयपीएल हे १० संघांमध्ये खेळवलं जात असून त्यापैकी चारच संघ खेळवले जाणार असल्याने गटांनुसार अंकांचं गणित आणि आकडेमोड पाहता अव्वल चारमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला स्थान मिळणं कठीण दिसत आहे.

दहा संघ असल्याने अडचण…
उदाहरणच द्यायचं झालं तर २०११ च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळवण्यात आले होते तेव्हा प्रत्येक संघ १४ सामने खेलला होता. त्यावेळे प्ले ऑफला पात्र ठरलेल्या चौथ्या संघाचे एकूण १६ गुण होते. तर १४ गुण असणारे संघ पात्र ठरले नव्हते. आठ संघ खेळवण्यात आलेल्या पर्वांमध्ये १४ गुणांसहीत संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेले. मात्र यंदा असं होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. २०११ नुसार हिशेब लावला तर अव्वल चारमध्ये पात्र ठरण्यासाठी संघांना किमान १६ गुण आवश्यक आहेत.

आठ विजय आवश्यक
आता हीच आकडेमोड लक्षात घेतल्यास आता मुंबईला त्यांच्या उरलेले आपले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र असं झालं नाही तर मुंबईला प्ले ऑफच्या आशा सोडून द्याव्या लागतील. मुंबईसाठी आणि संघाच्या चाहत्यांसाठी एकमेव चांगली गोष्टमध्ये यापूर्वीही मुंबईचा संघ अशा परिस्थितीमधून बाहेर येत थेट जेतेपदापर्यंत पोहचला होता.

आधीही केलाय असा पराक्रम…
२०१५ मध्ये मुंबईने त्यांच्या पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने गमावले होते. त्यानंतर पुढील आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकत त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर थेट जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र ते पर्व आठ संघांचं होतं आणि हे पर्व १० संघांमध्ये खेलवलं जात आहे. त्यामुळेच आता आठपैकी सात सामने जिंकून मुंबईला अव्वल चारमध्ये स्थान मिळवणं कठीण असेल. म्हणूनच मुंबईला आता आपले उर्वरित सर्वच्या सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकवे लागणार आहेत.

अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास…
अगदी थोड्यात सांगायचं झालं तर मुंबईला आता उर्वरित नऊ सामन्यांपैकी केवळ एक सामना गमवण्याची मूभा असून नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने किमान आठ सामने जिंकावे लागणार आहेत. तरच मुंबई प्ले ऑफमध्ये खेळू शकेल.