इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्ससाठी खराब जात असल्याचे दिसत आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सना सुरुवातीपासून सलग सहा पराभवांना सामोरे जावे लागले आहे. शून्य गुणांसह, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत तळाशी आहे. सर्वाधिक वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सला अजूनही विजयासाठी धडपडावं लागत आहे. आतापर्यंत सहा सामन्यात पराभव झालेला मुंबईचा संघ साखळी फेरीतच बाहेर पडण्याची शक्यता दाट झाली आहे. अशातच मुंबईत गुरुवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पुढील सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाकडून कसून सराव केला जात आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याआधी सराव सत्राला सुरुवात झाली. पण काही अनपेक्षित पाहुण्यांच्या आगमनामुळे तो काही काळासाठी थांबवण्यात आला होता. मुंबईच इंडियन्सच्या सरावामध्ये मधमाशांच्या थव्याने अडथळा आणला होता. मैदानावर मधमाश्या शिरताच मुंबईचे खेळाडू आणि प्रशिक्षक यांना जमिनीवर झोपावे लागले. या घटनेचा व्हिडिओ फ्रँचायझीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. काल सरावावेळी टू बी ऑर नॉट टू बी प्रश्न होता, असे कॅप्शन मुंबई इंडियन्सने व्हिडिओला दिले आहे. https://twitter.com/mipaltan/status/1516714540641136641?s=20&t=FbkTzRdHPHUxDrK9zEQ6FQ दरम्यान, बुधवारी, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने एका व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरसमध्ये बोलताना सांगितले की, “२१ एप्रिल रोजी सीएसकेविरुद्ध खेळताना संघाला गोलंदाजांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील त्यांचे गोलंदाजी आक्रमण विरोधी फलंदाजांनी क्लीनर्सकडे नेले आहे.” स्वत: उनाडकट, बासिल थंपी आणि मुरुगन अश्विनने सर्वाधिक धावा दिल्या आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता उर्वरित आठ सामने जिंकावे लागतील परंतु उनाडकट म्हणाला की तो फार पुढेचा विचार करत नाही. “इतका पुढचा विचार करण्याची गरज नाही. आमची कामगिरी सुधारण्यासाठी आम्हाला प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एकदा असे झाले की सर्व काही ठीक होईल. सध्या एक विजय आणि दोन गुणांसह खाते उघडणे महत्त्वाचे आहे,” असे उनाडकटने म्हटले.