RCB All Reacords in IPL : आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चालू असून या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर निर्धारित २० षटकांत बंगळुरूला ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारता आली आहे. या सामन्यात पंजाबचा जलदगती गोलंदाज काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येक ३ बळी घेत बंगळुरूचं कंबरडं मोडलं. या दोघांना अझमतुल्लाह ओमरझाई, युजवेंद्र चहल व विजयकुमार वैशाख या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली.

दरम्यान, बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. विराटला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी चांगली साथ दिली. या चौघांनाही चांगली सुरुवात करता आली. मात्र, मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी बंगळुरूचा संघ २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

बंगळुरूचा चौथा प्रयत्न

पंजाब व बंगळुरू या दोन्ही संघांनी आजवर कधीही आयपीएल चषक उंचावलेला नाही. त्यामुळे आज क्रिकेटरसिकांना नवा विजेता मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाला २००९ साली डेक्कन चार्जर्स हैदराबाद, २०११ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या फायनलमध्ये धूळ चारली होती. तर, पंजाबने २०१४ मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यावेळी या संघाला कोलकाता नाइट रायडर्सने मात दिली होती.

पहिला प्रयत्न : २००९ – बंगळुरू विरुद्ध डेक्कन चार्जर्स हैदराबाद (जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका)

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत सहा बाद १४३ धावा जमवल्या होत्या. परंतु, बंगळुरूचा संघ केवळ ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी बंगळुरूला सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरूचा कर्णधार अनिल कुंबळेने या सामन्यात १६ धावा देत चार बळी घेतले होते. तरीदेखील बंगळुरूचा संघ पराभूत झाला. कुंबळेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

दुसरा प्रयत्न : २०११ – बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (चेन्नई)

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद २०५ धावा जमवल्या होत्या. परंतु, बंगळुरूचा संघ केवळ ८ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी बंगळुरूला ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरा प्रयत्न : २०१६ – बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरू)

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद २०८ धावा जमवल्या होत्या. परंतु, बंगळुरूचा संघ केवळ ७ बाद २०० धावांपर्यंत मजल मारू शकला होता. परिणामी बंगळुरूला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.