Shikhar Dhawan reacts to Punjab’s defeat : आयपीएल २०२४ मधील २३ वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघातील हा रोमांचक सामना हैदराबाद संघाने २ धावांनी जिंकला. ज्यामुळे पंजाब किंग्जला हंगामातील तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन निराश दिसला. सामन्यानंतर शिखर धवनने संघाच्या पराभववार आपले मत मांडले. त्याचबरोबर धवनने आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांच्या फलंदाजीचेही कौतुक केले. या सामन्यात स्वतः धवनला विशेष धावा करता आल्या नाहीत.

पराभवानंतर शिखर धवन काय म्हणाला?

सामन्यानंतर धवन म्हणाला, “मला वाटते शशांक आणि आशुतोष यांनी शानदार खेळी खेळली. आम्ही सनरायझर्स हैदराबाद संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत रोखले, पण पहिल्या ६ षटकांचा फायदा आम्हाला घेता आला नाही. आम्ही ३ विकेट्स गमावल्या आणि इथेच आम्ही मागे पडलो. ज्याचे परिणाम आम्हाला शेवटी भोगावे लागले. आम्ही शेवटच्या चेंडूवर एक झेल सोडला, आम्ही त्यांना १०-१५ धावांपर्यंत कमी रोखू शकलो असतो, पण फलंदाजीने आम्हाला निराश केले.”

पंजाब किंग्जने ९१ धावांत ५ विकेट गमावल्यानंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा संघासाठी पुन्हा एकदा हिरो ठरले. दोन्ही खेळाडूंनी शानदार खेळी खेळली, पण ते संघाला विजयाचा उंबरठा ओलांडण्यास मदत करू शकले नाहीत. शशांकने २५ चेंडूत ४६ धावा केल्या, तर आशुतोषने १५ चेंडूत ३३ धावांची नाबाद खेळी केली.

हेही वाचा – ‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

शिखर धवनकडून आशुतोष आणि शशांकचे कौतुक –

या दोन खेळाडूंबद्दल बोलताना पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणाला, “मला वाटतं शशांक आणि आशुतोष यांनी शानदार खेळी खेळली. तरुण खेळाडूंना सातत्यपूर्ण काम करताना पाहून खूप आनंद होतो. आम्हाला आशा होती की ते दोघे मॅच फिनिश करु शकतील, पण आम्ही खूप जवळ येऊन जिंकू शकलो नाही. परंतु यामुळे आम्हाला भविष्यातील सामन्यांसाठी आत्मविश्वास नक्कीच मिळेल, पण पुढे जाण्यासाठी आम्हाला आणखी चांगली कामगिरी करावी लागेल.”

हेही वाचा – IPL 2024: १४० किमीचा वेगवान चेंडू अन् २५ सेकंदात स्टंपिंग, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर क्लासेनने धवनला केलं आऊट, VIDEO

हा सामना शेवटच्या षटकात अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला होता. पंजाबला विजयासाठी शेवटच्या सहा चेंडूत २९ धावांची गरज होती, पण संघाला केवळ २७ धावा करता आल्या. ज्यामुळे त्यांना २ धावांनी पराभव पत्करावा लागला. शशांक आणि आशुतोषच्या स्फोटक खेळीनंतरही पंजाबला ६ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावाच करता आल्या. हैदराबादकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन बळी घेतले. तत्पूर्वी, नितीश रेड्डीच्या ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केलेल्या ६४ धावांच्या बळावर हैदराबादने २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या. पंजाबकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ४, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.