PBKS vs RCB, Shreyas Iyer Statement: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. तर पराभूत झालेल्या पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. एलिमिनेटरचा सामना जिंकणारा संघ पंजाब किंग्जसोबत क्वालिफायर २ सामन्यात भिडणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर म्हणाला, सामना गमावला आहे, पण युद्ध अजूनही बाकी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “ हा दिवस मला विसरता येणार नाही. आता आम्हाला नवे प्लॅन तयार करावे लागतील. सामन्याच्या सुरुवातीला आम्ही विकेट्स गमावल्या. मी या सामन्यात जे निर्णय घेतले, त्यावर मी शंका घेत नाही. पण कधी कधी आपण जे प्लॅन तयार करतो, तो मैदानात अंमलात येत नाहीत. गोलंदाजांना दोष देणं योग्य ठरणार नाही, कारण धावसंख्या खूपच कमी होती. आता फलंदाजीवर काम करावं लागेल. आम्ही सामना हरलो आहे, पण युद्ध अजूनही बाकी आहे.”
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाचा डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला. पंजाबकडून एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी ३–३ गडी बाद केले. तर यश दयालने २, भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्डने प्रत्येकी १–१ गडी बाद केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १०२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने २ चौकारांसह १२ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजी करताना फिल सॉल्टने नाबाद ५६ धावांची खेळी केली. शेवटी मयांक अगरवालने १९ आणि रजत पाटीदारने नाबाद १५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.