Harsha Bhogle’s reaction to Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. फ्रँचायझीने गेल्या वर्षाच्या अखेरीस रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधार बनवले. तेव्हापासून मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे काही चाहते हार्दिकच्या मागे लागले आहेत. त्यांनी हार्दिकला कर्णधार म्हणून स्वीकारले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पहिले तीन सामनेही गमावले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक टीका होत आहे. अशात आता माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी हार्दिक पंड्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०२३ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. जिथे त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. इंडियन्सच्या मालकांनी त्याला पुनरागमनाची ऑफर दिली आणि नंतर त्याला कर्णधार बनवले, ज्यामुळे चाहते संतापले आहेत. त्यामुळे सोशल मीडियापासून स्टेडियमपर्यंत हार्दिकवर सतत टीका होत आहे.

‘हार्दिकने काय चुकीचे केले आहे?’

हर्षा भोगले क्रिकबझच्या एका कार्यक्रमात म्हणाले, “जे लोक हार्दिक पंड्याच्या मागे लागले आहेत, ते सांगू शकतील का हार्दिकने काय चूक केली आहे? समजा तुम्ही आयटी एक्झिक्युटिव्ह आहात आणि तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळाली, तर तुम्ही नाही म्हणाल का, मी ही ऑफर स्वीकारत नाही आहे?”

हेही वाचा – SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

हर्षा भोगले यांनी दिले दुसरे उदाहरण –

हर्षा भोगले पुढे म्हणाले, “कल्पना करा की तुम्ही एका कंपनीत सीएफओ आहात आणि तुम्हाला एका छोट्या कंपनीत सीईओ पद मिळाले तर तुम्ही नाही म्हणाल का, मी ते स्वीकारू शकत नाही? तुम्ही नक्कीच ऑफर स्वीकाराल. त्यानंतर, तुम्ही एखाद्या छोट्या कंपनीत सीईओ म्हणून चांगले काम केल्यास, तुमची जुनी कंपनी तुम्हाला परत बोलावून घेते. हार्दिकच्या बाबतीतही असेच घडले आहे.”

हेही वाचा – Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा केला सामना, VIDEO होतोय व्हायरल

‘द्वेष पाहून मला आश्चर्य वाटते’ – हर्षा

प्रसिद्ध समालोचक म्हणाले, “हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे खरे सांगायचे तर, सोशल मीडियावर त्याच्याबद्दलचा द्वेष पाहून मला आश्चर्य वाटले. मला वाटत नाही की हे केले पाहिजे. आपण पुढे कुठे पण बघा. इंटरनेटवर नेहमीच कोणता ना कोणत मुद्धा चर्चेत असतो. प्रत्येकजण तेच करू लागतो. एक मित्र दुसऱ्या मित्राला विचारतो की तू आज काय करतो आहेस? तेव्हा तो बोलतो काही नाही. मग ते ठरवतात चला आपण हार्दिकच्या मागे लागू आणि त्याला ट्रोल करु.”