हैदराबाद : मला आगळेवेगळे फटके मारायला आवडत नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही तंत्रशुद्ध फलंदाजी करून धावा करण्याचा, संघाला सामने जिंकवून देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे वक्तव्य रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने केले.
कोहलीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ६३ चेंडूंत १०० धावांची खेळी करताना बंगळूरुला विजय मिळवून दिला. या विजयामुळे बंगळूरुच्या ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. या ‘आयपीएल’ हंगामात कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी धावगतीवरून (स्ट्राइक रेट) त्याच्यावर बरीच टीका झाली आहे. कोहलीने यंदा १३ सामन्यांत १३५.८५च्या धावगतीने धावा केल्या आहेत. मात्र, लोकांच्या मतांना मी फारसे महत्त्व देत नाही. सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळण्यास मी प्राधान्य देतो, असे कोहलीने सांगितले.
‘‘मी आकडय़ांबाबत विचार करत नाही. ‘आयपीएल’मध्ये माझ्या नावे आता सहा शतके आहेत. मी अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या असल्या, तरी स्वत:ला फार श्रेय देत नाही. संघाबाहेरील लोकांचे मतही माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाही. आव्हानात्मक परिस्थितीत धावा कशा करायच्या हे मला ठाऊक आहे. चांगली कामगिरी करून संघाला सामने जिंकवून देण्याची माझ्यात क्षमता आहे,’’ असे कोहली म्हणाला. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांमध्ये आक्रमक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांत कोहलीला बरेचदा धावांची गती कायम राखता येत नाही. मात्र, धावगती वाढावी यासाठी आपण वेगळे फटके मारणार नाही, हे कोहलीने स्पष्ट केले. ‘‘वेडेवाकडे फटके मारणे मला पसंत नाही. आम्हाला १२ महिने क्रिकेट खेळायचे असते. ‘आयपीएल’नंतर आम्ही कसोटी क्रिकेट खेळणार आहोत. त्यामुळे मी तंत्रात बदल करणे टाळतो. तंत्रशुद्ध फलंदाजी करूनच संघाला सामने जिंकवून देण्याचा माझा प्रयत्न असतो,’’ असे कोहलीने सांगितले.