Shreyas Iyer IPL 2025 Final: मंगळवारी ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा अंतिम सामना झाला. यात RCB अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं पंजाब किंग्जचा अवघ्या ६ धावांनी पराभव केला. गेल्या १८ वर्षांत पहिल्यांदाच आरसीबीला आयपीएलचं विजेतेपद जिंकण्यात यश आलं. मात्र, दुसरीकडे आता PBKS च्या पराभवाची कारणं शोधली जात आहेत. एकेकाळी पंजाब किंग्जचा कर्णधार व प्रमुख खेळाडू असणाऱ्या युवराज सिंगच्या वडिलांनी या पराभवासाठी कर्णधार श्रेयस अय्यरनं मारलेल्या एका फटक्याला दोषी धरलं आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पहिली फलंदाजी करताना आरसीबीनं पंजाब किंग्जसमोर विजयासाठी १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं. आयपीएल अंतिम सामन्यातली ही आजपर्यंतची दुसरी मोठी धावसंख्या होती. त्यामुळे सामना दोन्ही बाजूंनी बरोबरीच्या पातळीवर असल्याचं बोललं जात होतं. पंजाबनं सुरुवात देखील आश्वासक करत विजेतेपदावर आपला दावा असल्याचं स्पष्ट केलं. पण पंजाबचे खेळाडू ठराविक काळानंतर बाद होत गेले. शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावा आवश्यक असताना शशांक सिंगनं तुफान फटकेबाजी करून सामना अगदी काठावर नेऊन ठेवला.

श्रेयस अय्यरवर पराभवाचं खापर?

शेवटच्या षटकात पंजाबला फक्त २२ धावा करता आल्या. त्यामुळे RCB च्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. पण या सर्व घडामोडींमध्ये आता कर्णधार श्रेयस अय्यरच्या खेळीची चर्चा होऊ लागली आहे. युवराज सिंगचे वडील व माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी या पराभवासाठी श्रेयस अय्यरला दोषी धरलं आहे. श्रेयसनं मारलेला एक चुकीचा फटका पंजाबच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचा दावा करतानाच योगराज सिंग यांनी श्रेयसवर या चुकीसाठी दोन सामन्यांची बंदी घातली जावी, अशी भूमिका घेतली आहे.

“श्रेयस अय्यरनं अंतिम सामन्यात फलंदाजी करताना खेळलेला फटका हा माझ्यामते मोठा गुन्हा आहे. अशोक मंकडनं मला या गुन्ह्याबद्दल सांगितलं होतं. हा गुन्हा कलम ३०२ नुसार शिक्षेस पात्र ठरतो. मंकडनं मला या गुन्ह्याचे परिणामही सांगितले होते. त्यानुसार, अशा खेळाडूवर दोन सामन्यांची बंदी घातली जायला हवी. श्रेयस अय्यरनं अंतिम सामन्यात जे केलं, ते अजिबात स्वीकारार्ह नाही. या चुकीला माफी नाही”, अशा शब्दांत योगराज यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

भारतीय न्यायसंहितेनुसार कलम ३०२ हे हत्येच्या प्रकरणात लागू केले जाते. योगराज यांनी श्रेयस अय्यरचा तो चुकीचा फटका पंजाबच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याच्या संदर्भात हे विधान केलं असून तो फटका मारणं हा त्याचा गुन्हाच असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय झालं IPL च्या अंतिम सामन्यात?

बंगळुरूचं १९१ धावांचं आव्हान पूर्ण करताना पंजाबकडून सलामीवीर प्रियांश आर्या (२४) आणि प्रभसिमरन सिंग (२६) यांनी चांगली सुरुवात करून दिली. जॉश इंग्लिसनंही ३९ धावांचं महत्त्वाचं योगदान दिलं. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबचा भरंवशाचा फलंदाज खुद्द कर्णधार श्रेयस अय्यर मात्र अवघ्या दोन चेंडूंमध्ये एक धाव बाद झाला. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने एकेरी धावेसाठी मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यर यष्टीरक्षक रोमारियो शेफर्डकडे झेल देऊन बाद झाला.