दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यात व्यस्त असलेले भारतीय खेळाडू आता पुन्हा अंगावर निळी जर्सी घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघ उद्यापासून (९ जून) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय चमूसाठी वाईट बातमी मिळाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल जखमी झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी ऋषभ पंतकडे संघाचे धुरा असेल.

माजी कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यामुळे आणि रोहित शर्मादेखील या मालिकेसाठी उपलब्ध नसल्यामुळे पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी राहुलला कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते. त्याने सराव सत्रामध्ये सहभागही घेतला होता. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येला तो दुखापतग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तो साधारण ९ ते १९ जून दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये आता ऋषभ पंत कर्णधार आणि हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आघाडीच्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यात आता के एल राहुलची भर पडली आहे. त्यामुळे संघातील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना पार पाडावी लागणार आहे. या दोन्ही खेळाडूंकडे आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे.