आपल्या देशात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. कदाचिक क्रिकेट हा एकमेव खेळ असेल ज्यासाठी सर्व भारतीय कुठल्याही मतभेदांशिवाय एकत्र येतात. क्रिकेट हा आपल्यासाठी फक्त एक खेळ नाही. त्यासोबत भारताच्या आणि भारतीयांच्या कित्येक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. अशीच एक घटना १९८५मध्ये क्रिकेटच्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेवेळी घडली होती. भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे ही घटना आणि तिच्याशी निगडीत आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. रवी शास्त्रींनी, जागतिक चॅम्पियनशीपवेळी त्यांना मिळालेल्या ऑडी १०० या कारचे काही फोटो ट्विट केले आहेत.

अलीकडेच सुपर कार क्लब गॅरेजने ती कार रिस्टोर केली. मुंबईतील जेके हाऊस येथे रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक गौतम हरी सिंघानिया यांच्याकडून शास्त्रींना कारच्या चाव्या देण्यात आल्या. ही कार राष्ट्रीय संपत्ती असल्याचे शास्त्री म्हणाले आहेत. ते असे का म्हणाले, यामागची गोष्ट मोठी रंजक आहे.

१९८३ मध्ये भारताने आपला पहिलावहिला विश्वचषक जिंकला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटचा सुवर्ण काळ सुरू झाल्याची ती नांदी होती. त्यानंतर १९८५ हे वर्षही भारतीय क्रिकेटसाठी चांगले ठरले होते. त्यावर्षी भारताने क्रिकेटची जागतिक चॅम्पियनशिप आपल्या नावे केली होती. रवी शास्त्री यांनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या या चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरणाऱ्या खेळाडूला ‘ऑडी १००’ कार महागडी कार बक्षीस म्हणून मिळणार होती. त्यावेळी अशी कार मिळणे म्हणजे फारच विशेष होते. रवी शास्त्रींना ही कार मिळण्याची सर्वात जास्त शक्यता होती. मात्र, पाकिस्तानचा खेळाडू जावेद मियाँदाद अंतिम सामन्यात शास्त्रींना कारबद्दल टोमणे मारून विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा – “भाऊ, वहिनीला सांगा आम्हाला प्रशिक्षण द्या”, पाकिस्तानी टेनिसपटूची शोएब मलिकला विनंती

रवी शास्त्री यांनी सांगितल्यानुसार, अंतिम सामन्यात जावेद मियाँदाद शास्त्रींना म्हणत होता, “सारखं सारखं काय त्या गाडीकडे बघतोयस? ती नाही मिळणार तुला.” जावेदच्या कुरापतींना शास्त्रींनी चोख उत्तर दिले होते. ‘ती ऑडी १०० माझ्याकडेच येत आहे, असे ते म्हणाले होते. शेवटी शास्त्रींचे म्हणणे खरे ठरले. शास्त्रींनी त्या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्यांनी १८२ धावा केल्या होत्या आणि आठ बळी मिळवले होते. त्यामुळे ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरल्यानंतर रवी शास्त्रींना ती ऑडी कार मिळाली. त्यांनी संपूर्ण संघाला कारमध्ये बसवून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची चक्कर मारली होती.

या गाडीसोबत प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून भारताने विजेतपद आणि ऑडी कार दोन्हीही जिंकले होते. या कामगिरीवर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीदेखील खुश झाले होते. त्यांनी भारतीय सीमाशुल्क विभागाला विशेष आदेश जारी करून ऑडी कारवर लागणारे आयात शुल्क माफ केले होते.