Gautam Gambhir and Manoj Tiwary controversy : मनोज तिवारी आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद हा जुना असला तरी, आता नवे रूप धारण केले आहे. मनोज तिवारी सध्या क्रिकेट सेटअपपासून दूर आहे, पण गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मनोज तिवारी या वादाला कुठून सुरुवात झाली याबाबत खुलासा केला आहे. जे एकेकाळी शिवीगाळात रूपांतरित झाले आणि हाणामारीपर्यंत पोहोचले होता. मनोज तिवारी हा तोच माजी क्रिकेटपटू आहे, ज्याने नुकतेच गौतम गंभीरला ढोंगी असल्याचे म्हटले होते.

मनोज तिवारीने ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, २०१३ च्या आयपीएल दरम्यान गौतम गंभीरसोबत त्याचे मतभेद झाले होते. त्यावेळी गंभीर कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर संघाचा कर्णधार होता. मनोज तिवारीने सांगितले की, २०१५ मध्ये रणजी सामन्यात त्याच्या आणि गंभीरमध्ये भांडण झाले होते, जे २०१३ च्या आयपीएलमध्ये सुरू झाले होते.

गौतम गंभीर आणि मनोज तिवारीच्या वादाला कुठून सुरुवात झाली?

मनोज तिवारीने म्हणाला की, “तो आधीच रागावला होता. कारण माझा त्याच्यासोबत केकेआरमध्ये असताना वाद झाला होता. कारण केकेआरमधील माझी बॅटिंग ऑर्डर सतत खाली जात होती आणि त्यावेळी माझी भारतीय संघातील जागा पक्की झाली नव्हती. त्यावेळी जो परदेशी संघ आला होता, त्यांच्याविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये मला संधी मिळाली होती. अशाच एका सामन्यात मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या होत्या. मी १२९ धावा केल्या होत्या आणि त्याने १०५ धावा केल्या होत्या. त्या सामन्यातही त्याला राग आला होता. डाव संपल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी जायचे होते. मी सनस्क्रीन लावत असताना त्याला अचानक राग आला. तू काय करत आहेस? चल, लवकर खाली ये. असं तो मला म्हणाला होता.”

अन्यथा हाणामारी झाली असती –

मनोज तिवारी पुढे म्हणाले, “या वादानंतर मी अस्वस्थ झालो. ईडन गार्डन्सवरील सामन्यादरम्यान, डाव संपल्यानंतर मी वॉशरूममध्ये गेलो असता, तो मागून आला आणि म्हणू लागला, ‘तुझी ही वृत्ती चालणार नाही. मी तुला संघात खेळवणार नाही. तो वरिष्ठ खेळाडू होता. मी त्यांचा आदर करायचो, पण यावेळी मला राग आला आणि म्हणालो गौती भाई, हे चालणार नाही. मग वसीम अक्रम (जो केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा भाग होता) मध्ये आले. त्यामुळे त्या दिवशी तिथे थांबलो, अन्यथा हाणामारी झाली असती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतम गंभीरने शिवीगाळ केल्याचा आरोप –

केकेआरमध्ये झालेल्या वादानंतर पुन्हा २०१५ साली दोघे आमने-सामने आले होते, तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. मनोज तिवारीच्या म्हणण्यानुसार, गौतम गंभीरने त्याला त्याच्या आई आणि बहिणीवरुन शिवीगाळ केली होती. मनोज तिवारीने पुढे सांगितले की तो गार्ड घेण्याच्या तयारीत होता (फलंदाजीसाठी तयार), पण यावेळी गौतम गंभीरला वाटले की तो वेळ वाया घालवत आहे. तो म्हणाला, “मी लेग गार्ड घालत असताना तो स्लिमध्ये उभा होता आणि शिवीगाळ करू लागला. अशी शिवी जी मी सांगू पण शकत नाही. मी कधीही माझ्या आई किंवा बहिणीवरुन अशी कोणाकडूनही शिवीगाळ ऐकली नव्हती आणि केली पण नव्हती. यानंतरही मी रागावर संयम ठेवत त्याला विचारले गौती भाऊ शिव्या का देतोयस? यावर तो म्हणाला, मला संध्याकाळी भेट तुला दाखवतो, त्यानंतर मी संध्याकाळी कशाला आताच दाखवना. यानंतर पंच आले आणि वाद थांबवला.”