वृत्तसंस्था, हैदराबाद सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज सहजपणे फटकेबाजी करत असताना जसप्रीत बुमराने सामन्याच्या १३व्या षटकापर्यंत केवळ एक षटक टाकले होते. बुमरासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला रोखून ठेवण्याचा हार्दिक पंडय़ाचा निर्णय आश्चर्यचकित करणारा होता, अशी टीका ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर केली. हैदराबाद आणि मुंबई यांच्यात बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तब्बल २७७ धावांची मजल मारली. ‘आयपीएल’मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर मुंबईनेही आक्रमक शैलीत खेळताना ५ बाद २४६ धावा केल्या. मात्र, अखेरीस त्यांना ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. बुमराने आपल्या चार षटकांत ३६ धावा दिल्या. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनंतर (२/३५) बुमराच सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज होता. हेही वाचा >>>IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव ‘‘मुंबईने गोलंदाजांचा केलेला वापर आश्चर्यचकित करणारा होता. बुमराने हैदराबादच्या डावातील चौथे षटक टाकले आणि केवळ पाच धावा दिल्या. मात्र, त्यानंतर त्याला १३व्या षटकापर्यंत पुन्हा गोलंदाजीच मिळाली नाही. बुमराने आपले दुसरे षटक टाकेपर्यंत हैदराबादच्या १७३ धावा झालेल्या होत्या. हैदराबादने पूर्णपणे वर्चस्व मिळवले होते. बुमरा मुंबईचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज वरचढ ठरत असताना त्याला गोलंदाजी देऊन बळी मिळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता,’’ असे स्मिथने नमूद केले. ‘‘कर्णधार म्हणून हार्दिककडून काही चुका झाल्या आणि ही त्याची सर्वात मोठी चूक होती. बुमरा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्यासारख्या गोलंदाजाला तुम्ही १३व्या षटकापर्यंत केवळ सहा चेंडू टाकायला देणे योग्य नाही. कर्णधार म्हणून तुम्ही परिस्थितीनुसार योजनांमध्ये बदल केला पाहिजे. मी कर्णधार असतो, तर हैदराबादच्या डावातील १५-१६व्या षटकापर्यंत बुमराची चारही षटके संपवली असती. तुम्ही बळी मिळवल्यास प्रतिस्पर्धी संघाची धावगतीही कमी होती. हार्दिकने बुमराला आणखी लवकर गोलंदाजी दिली असती, तर हैदराबादची धावसंख्या २७७ ऐवजी २४० वगैरे झाली असती. या धावसंख्येचा पाठलाग करणे मुंबईला शक्य झाले असते,’’ असेही स्मिथने सांगितले.