‘कबड्डीतील विश्वविजेत्यांच्या नशिबी प्रतीक्षाच’ या लोकसत्तामध्ये १७ जानेवारी रोजी छापून आलेल्या बातमीची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून विश्वविजेत्या कबड्डीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोगाने थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच पत्र पाठवले आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतीय महिला संघाने कबड्डी विश्वविजेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने भारतीय संघातील दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या राज्यातील खेळाडूंना एक कोटी रुपयांचे तर प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पण १० महिने पालटून गेले तरी या खेळाडूंना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
‘‘कबड्डी विश्वचषक जिंकून ज्या खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल केले, त्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तजवीज करावी आणि या प्रकरणी सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष घालावे. महिलाशक्तीसाठी नेहमीच पुढाकार घेणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नक्कीच योग्य ती पावले उचलतील, अशी आशा आहे,’’ असे या पत्रात म्हटले आहे.