ज्ञानेश भुरे
पुणे : स्वप्निल कमालीचा शांत आणि संयमी मुलगा आहे. त्याच्या स्वभावातील प्रत्येक गुण त्याच्या नेमबाजीत परावर्तीत होत असतात. त्यामुळे त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती, असे मत भारताची माजी ऑलिम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंतने व्यक्त केले.
तेजस्विनी आणि स्वप्निल एकाच म्हणजे कोल्हापूर शहरातून नावारूपाला आलेले नेमबाज आहेत. स्वप्निलने पात्रता फेरीतील कामगिरीनंतर तेजस्विनीचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असे सांगितले. मात्र, तेजस्विनी हे श्रेय घ्यायला तयार नाही. ‘‘तो पुण्यातच माझ्याबरोबर सराव करतो. एक अनुभवी नेमबाज म्हणून मी केवळ त्याला माझे आतापर्यंतचे अनुभव सांगत आले. आव्हानाची कल्पना दिली आणि त्यानुसार पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्याने हा सल्ला तंतोतंत पाळला आणि एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्राचा एक नेमबाज अंतिम फेरी गाठतो ही मोठी उपलब्धी आहे आणि याचा मला खूप आनंद झाला आहे,’’ असेही तेजस्विनीने सांगितले.
हेही वाचा >>>Paris Olympic 2024 Day 5 Highlights : कसं असणार भारताचं १ ऑगस्टचं वेळापत्रक? कोणकोण अॅक्शनमध्ये दिसणार? जाणून घ्या
‘‘पात्रता फेरीतून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या नेमबाजांचे गुण पाहिलेे, तर बहुतेक जण बरोबरीतच राहिले आहेत. केवळ सर्वाधिक १० गुण कमावल्याच्या जोरावर त्यांची क्रमवारी निश्चित झाली आहे. यामुळे अंतिम फेरीत आव्हान कठीण आहे. पण, तो हे आव्हानही पार करेल याची खात्री आहे. मुख्य म्हणजे स्वप्निल कमालीचा शांत आहे. दडपणाच्या आव्हानाचा सामना त्याने अनेकदा करून दाखवला आहे. या वेळी देखील तो यावर मात करेल. मैदानावरील कामगिरीला थोडीशी दैवाची साथ मिळायला हवी. आपले आणखी एक पदक निश्चित असेल,’’ असेही तेजस्विनी म्हणाली.