मुंबई : नव्या वर्षांत विश्वचषक जिंकणे आणि आक्रमक शैलीत खेळणे ही भारतीय संघाची दोन प्रमुख उद्दिष्टे असतील, असे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंडय़ा सोमवारी म्हणाला. युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल. त्यांना आपला नैसर्गिक, आक्रमक खेळ करण्याची पूर्ण मोकळीक असेल, असेही हार्दिकने स्पष्ट केले. ‘‘विश्वचषक जिंकण्यापेक्षा मोठे लक्ष्य असू शकत नाही. आम्हाला विश्वचषक जिंकायचा असून त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला हार्दिक म्हणाला.श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना नैसर्गिक खेळ करण्याचा हार्दिकने सल्ला दिला आहे. ‘‘आम्ही आमच्या खेळाडूंना मैदानावर जाऊन आपला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले आहे. कर्णधार म्हणून माझा सर्व खेळाडूंना पूर्ण पािठबा असेल. त्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल. मी त्यांच्यावर विश्वास दाखवणे अत्यंत आवश्यक आहे,’’ असेही हार्दिकने सांगितले. आणखी वाचा - India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार ‘‘आमचा संघ कोणत्या शैलीत खेळणार हे आम्ही ठरवले आहे. ‘आयपीएल’पूर्वी आम्हाला केवळ सहा ट्वेन्टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आमच्याकडे फार वेळ नाही. मात्र भविष्याचा विचार करून आम्ही नव्या योजना आखू. कोणत्या योजना फायदेशीर ठरत आहेत, हे पाहू,’’ असे हार्दिक म्हणाला. हेही वाचा - भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका: कर्णधार हार्दिकसह युवा खेळाडूंवर नजर पंतची कमी जाणवेल ऋषभ पंतची अनुपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवेल. त्याच्यामुळे संघ अधिक संतुलित होतो. तो लवकरच बरा व्हावा यासाठी आम्ही सर्वच प्रार्थना करत आहोत, असे हार्दिक म्हणाला. ‘‘पंतबाबत जे घडले,ते अत्यंत दुर्दैवी होते. आमचे प्रेम आणि आमच्या प्रार्थना कायमच पंतच्या सोबत आहेत. तो लवकरच बरा होईल अशी आम्ही आशा करतो,’’ असेही हार्दिकने नमूद केले.