सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग या तिघांची कौशल्य एकाच युवा खेळाडूमध्ये दिसत असल्याचं रवी शास्त्री म्हणाले होते. हा युवा खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ. पण पृथ्वी शॉचं करियर सध्या धोक्यात आलं आहे. परिस्थिती अशी आली आहे की पृथ्वी शॉला मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आलंय. आता तो मुंबई क्रिकेट सोडून दुसऱ्या संघात जात आहे. पृथ्वी शॉने यावेळी कबूल केलं आहे की त्याने काही चुका केल्या ज्यामुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झालं.
पृथ्वी शॉच्या मते, जेव्हा तो संघर्ष करत होता, तेव्हा एका क्रिकेटपटूशिवाय टीम इंडियाच्या कोणत्याही मोठ्या खेळाडूने त्याला फोन केला नाही. पृथ्वी शॉने २०१८ मध्ये भारतासाठी पदार्पण केलं. त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्यावेळी संपूर्ण जग पृथ्वीचे कौतुक करत होते. पण तीन वर्षांतच हा क्रिकेटपटू टीम इंडियामधून बाहेर पडला.
२०२१ मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळलेल्या पृथ्वी शॉ ला २०२५ मध्ये मुंबई क्रिकेट संघातून वगळण्यात आलं. त्याला आयपीएल २०२५ च्या कोणत्याही संघात स्थान मिळालं नाही. २५ वर्षीय पृथ्वी शॉ ने आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याची कारकीर्द आणि त्यातील संघर्षावर वक्तव्य केलं आहे. पृथ्वी शॉ इतकंही म्हणाला की, ऋषभ पंतशिवाय कोणीच त्याला संघर्षाच्या काळात कॉल केला नाही, त्याची विचारपूस केली नाही.
पृथ्वी शॉ म्हणाला की, “बऱ्याच गोष्टी आहेत. मला माहित आहे काय घडलंय. मी ते समजू शकतो. मी आयुष्यात बरेच चुकीचे निर्णय घेतले आहेत. मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. मी आधी खूप सराव करायचो. म्हणजे ३-४ तास नेटमध्ये सराव करायचो आणि मला फलंदाजी करायचा कधीच कंटाळा यायचा नाही. माझं लक्ष विचलित झालं होतं.”
पृथ्वी पुढे म्हणाला, “त्यानंतर मी फार गरजेच्या नसलेल्या गोष्टी महत्त्वाच्या मानू लागलो. मी काही चुकीच्या लोकांशी मैत्री केली. त्यावेळी मी त्यावेळी टॉपला होतो, म्हणून मैत्री होऊ लागली. मग त्यांनी मला इकडे तिकडे नेलं. त्या सर्व गोष्टींमुळे माझं लक्ष विचलित झालं. मी आधी ८ तास सराव करायचो. आता ४ तासांवर आलं.” पृथ्वी शॉ आता त्याच्या चुकांवर मात करत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.