वेगवान गोलंदाज लक्षय गर्गच्या भेदक माऱ्यापुढे (६/४६) गोव्याविरुद्धच्या रणजी करंडक लढतीत मुंबईचा पहिला डाव फक्त १६३ धावांत आटोपला. मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला, तर सौराष्ट्रविरुद्ध २७५ धावांची खेळी साकारणाऱ्या सर्फराज खानने (११० चेंडूंत ६३ धावा) एकाकी झुंज दिली. एलिट ड-गटाच्या लढतीत गोव्याने पहिल्याच दिवशी अनपेक्षित कामगिरी करीत ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईविरुद्धच्या सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. गर्गने कर्णधार पृथ्वी शॉचा (९) अडथळा दूर केल्यानंतर रहाणेला पायचीत केले. त्यानंतर सर्फराज आणि सचिन यांनी चौथ्या गड्यासाठी सर्वाधिक ७५ धावांची भागीदारी रचली. तनुष कोटियन (३०), सचिन यादव (२७) व आकर्षित गोमेल (२१) यांनीसुद्धा महत्त्वाचे योगदान दिले. परंतु ५२.४ षटकांत मुंबईचा डाव आटोपला. गोव्याकडून अमित यादवने ४७ धावांत ४ बळी घेतले. त्यानंतर, गोव्याने पहिल्या डावात २ बाद ११४ अशी दमदार मजल मारली. अमोघ देसाई (खेळत आहे ५१) आणि सुयश प्रभुदेसाई (४०) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. संक्षिप्त धावफलक ’ मुंबई (पहिला डाव) : ५२.४ षटकांत सर्व बाद १६३ (सर्फराज खान ६३; लक्षय गर्ग ६/४६, अमित यादव ४/४७) ’ गोवा (पहिला डाव) : ३३ षटकांत २ बाद ११४ (अमोघ देसाई खेळत आहे ५१, सुयश प्रभुदेसाई ४०; मोहित अवस्थी १/१४)