MUM vs MP Ranji Trophy Final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२१-२०२२ या हंगामाचा आज समारोप झाला. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने मुंबईच्या संघावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशच्या संघाने ४१वेळच्या विजेत्या मुंबईचा सहा गडी राखून परावभव केला.

शेवटच्या दिवशी मुंबईने मध्य प्रदेशच्या संघासमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे मध्य प्रदेशच्या संघाने २९.५ षटकांतच पूर्ण केले. यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार हे मध्य प्रदेशच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांनी संघाला पहिल्या डावात शतकी आघाडी मिळवून दिली होती. या विजयामुळे मध्य प्रदेशच्या संघाने ६७ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

मध्यप्रदेशचा हा विजय खेळाडूंसोबतच प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासाठी देखील विशेष ठरला आहे. १९९८-९९मध्ये चंद्रकांत पंडित यांच्याच नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेशच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना विजय मिळवणे शक्य झाले नव्हते. जे कर्णधार म्हणून पंडित यांना साध्य करता आले नाही ते प्रशिक्षक म्हणून त्यांनी करून दाखवले आहे.

त्यापूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात सर्फराज खानच्या शतकाच्या जोरावर ३७४ धावा केल्या होत्या. मुंबईला चोख प्रत्त्युत्तर देत मध्य प्रदेशच्या संघाने पहिल्याच डावात १६२ धावांची आघाडी घेत ५३६ धावा केल्या. मध्य प्रदेशच्यावतीने यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी पहिल्या डावात शतके झळकावली होती.

पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याने मुंबईचा आत्मविश्वास कमकुवत झाल्याचे दिसत होते. दुसऱ्या डावात वेगात खेळण्याच्या प्रयत्नात मुंबईचा संपूर्ण संघ २६९ धावांत गारद झाला होता. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने ४ बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले. त्यामुळे मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात विजयासाठी १०८ धावांचे माफक लक्ष्य मिळाले होते. मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी ३०व्या षटकातच ते पूर्ण केले. रजत पाटीदारने विजयी फटका मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंतिम सामन्यात मध्य प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागल्याने मुंबईच्या ४२वे विजेतेपद मिळवण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. कर्णधार पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात खेळलेल्या मुंबईच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.