इंग्लंडविरुद्ध गुरूवारी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यातून सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धडाक्यात सुरूवात केली. कारकिर्दीतील पहिलाच चेंडू त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकला आणि त्यावर उत्तुंग षटकार खेचत सूर्यकुमारने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. सहा चौकार आणि तीन षटकरांची बरसात करत आपल्या पदार्पणाच्या खेळीत त्याने ३१ चेंडूत ५७ धावा ठोकल्या. तसं बघायला गेलं तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. पण त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तिसऱ्या सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर काल झालेल्या चौथ्या सामन्यात सूर्यकुमारला पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत त्याने दमदार अर्धशतक झळकावलं.

आणखी वाचा- IND vs ENG: इंग्लंडविरोधातील विजयाचा शिल्पकार सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सूर्यकुमारच्या विस्फोटक खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडला चौथ्या टी-२० सामन्यात आठ धावांनी धुळ चारली. शानदार खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरीच्या बळावर संघात स्थान मिळवणाऱ्या सूर्यकुमारविषयी त्याच्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने २०११ मध्ये एक भविष्यवाणी केली होती. रोहितने १० डिसेंबर, २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. काही प्रतिभावान खेळाडू येणार आहेत….भविष्यात मुंबईच्या सूर्यकुमार यादववर लक्ष ठेवावं लागेल, असं ट्विट रोहितने चेन्नईमध्ये बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यानंतर केलं होतं. रोहितची ही भविष्यवाणी सूर्यकुमारने आपल्या कालच्या खेळीने खरी ठरवली असून टीम इंडियात दणक्यात एंट्री घेतली आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी..! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


आपल्या पदार्पणाच्या इनिंगमध्येच अर्धशतक झळकावणारा सूर्यकुमार पाचवा भारतीय फलंदाज ठरलाय. सूर्यकुमारच्याआधी रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे आणि इशान किशन यांनी ही कामगिरी केली आहे. रॉबिन उथप्पाने २००७ च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरोधात टी२० मध्ये अर्धशतक ठोकलं होतं, त्याच वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मानेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणाच्या इनिंगमध्ये नाबाद ५० धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने पदार्पणाच्या टी-२० सामन्यात ६१ धावांची खेळी केली होती. तर सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इशान किशनने शानदार ५६धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

आणखी वाचा- “माझ्या वर्ल्ड कपच्या संघात याची जागा पक्की”, सूर्यकुमारच्या फलंदाजीवर ‘सिक्सर किंग’ झाला फिदा

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात मुंबईसाठी खेळताना सूर्यकुमारने सतत चांगलं प्रदर्शन करत आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्याने १५ सामन्यात ४८० धावा ठोकल्या होत्या, त्याच बळावर त्याने टीम इंडियात जागा मिळवली. एकूण १०१ आयपीएल सामन्यात ३०.२० च्या सरासरीने त्याने २०२४ धावा केल्या आहेत. यात ११ अर्धशतकांचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सपूर्वी आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाचाही भाग होता.