टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावरून मायदेशी परतली आहे. एकदिवसीय मालिका २-१ने जिंकणाऱ्या टीम इंडियाने टी-२० मालिकेत १-२ असा पराभव पत्करला. टी-२० मालिकेत भारतीय युवा फलंदाज स्वतःला सिद्ध करू शकले नाहीत. या फलंदाजांमध्ये संजू सॅमसनचेही नाव आहे. त्याला तीनही टी-२० सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण तो फ्लॉप ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने संजू सॅमसनला आळशी फलंदाज म्हणत टीका केली आहे. यासोबतच त्याने संजूच्या तंत्रातील दोषांकडेही लक्ष वेधले. सलमान बट म्हणाला, ''संजू सॅमसन मला आळशी फलंदाज वाटतो. जेव्हा तुम्हाला माहीत असते, की तुम्ही हसरंगाला खेळू शकत नाही, तेव्हा तुम्ही तुमचा पाय पुढे ठेवला पाहिजे आणि त्याची षटके घालवली पाहिजेत. पण असे असूनही संजू सॅमसनने बॅकफूटवरून हसरंगाला खेळण्याचा प्रयत्न केला. यामुळेच तो पायचित पकडला गेला.'' सलमान बटने संजू सॅमसनला बेजबाबदरही म्हटले. तो म्हणाला, ''मला संजू सॅमसन थोडा बेजबाबदर वाटला. जेव्हा तुम्हाला माहीत असते, की तुमच्याकडे फक्त पाच फलंदाज आहेत आणि तुम्ही त्यापैकी एक आहात आणि दोन आधीच आऊट झाले आहेत, तेव्हा तुम्ही थोडे अधिक काळजीपूर्वक खेळायला हवे. पण मला संजू सॅमसनच्या आत काही करून दाखवण्याचा आत्मा दिसला नाही.'' हेही वाचा - "धोनीशिवाय फ्रेंडशिप डे?", युवराजच्या नॉस्टाल्जिक व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या खवचट प्रतिक्रिया संजू सॅमसनने श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांमध्ये ३४ धावा केल्या. शेवटच्या टी-२० मध्ये तो खातेही उघडू शकला नाही. संजू सॅमसनने त्याच्या एकदिवसीय पदार्पणात ४६ धावा केल्या, पण त्या डावात त्याने खूप चुकीचे फटके खेळले. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही टी-२० मालिका गमावल्यानंतर सॅमसनबाबत भाष्य केले. द्रविड म्हणाला, ''फलंदाज तरुण आहेत, ते शिकतील. पण हे देखील खरे आहे, की जेव्हा संजू सॅमसन श्रीलंका मालिकेकडे परत पाहिल, तेव्हा तो निराश होईल.''