भारताच्या कठोर विरोधाला न जुमानता, राष्ट्रकुल खेळांमधून नेमबाजी खेळ हद्दपार करण्याचा निर्णयाला अनुमती देण्यात आली आहे. राष्ट्रकुल खेळांच्या कार्यकारी मंडळाने महिला क्रिकेट, पॅरा टेबल टेनिस आणि बीच व्हॉलीबॉल या खेळांना मान्यता दिली आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या ५१ टक्के देशांनी या बदलाला आपली सहमती दर्शवली आहे. राष्ट्रीय नेमबाजी संघटना आणि भारताची राष्ट्रीय रायफल नेमबाजी संघटना या संस्था, राष्ट्रकुल खेळांमध्ये नेमबाजीचं स्थान कायम रहावं याबाबत प्रयत्नशील होत्या. मात्र त्यांचे प्रयत्न अखेरीस तोकडेच पडले आहेत.

१९६६ साली झालेल्या किंगस्टन येथे झालेल्या स्पर्धांमध्ये नेमबाजी खेळाचा सहभाग करण्यात आला होता. १९७० सालचा अपवाद वगळता आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये नेमबाजीने सहभाग नोंदवला आहे. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात भारताने आतापर्यंत ४३८ पदकं मिळवली आहेत. यामध्ये १५५ सुवर्णपदकं जमा असून, ११८ पदकं ही नेमबाजीमधून मिळालेली आहेत.

महिला क्रिकेट, पॅरा टेबल टेनिस आणि बीच व्हॉलीबॉल या खेळांमुळे नवीन प्रेक्षकवर्ग राष्ट्रकुल खेळांसोबत जोडला जाईल. या प्रस्तावावर पुढच्या महिन्यात अधिकृतरित्या मतदान होणार आहे. १९९८ साली क्वालालम्पूर येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेचं सुवर्णपदक मिळवलं होतं. आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २०२२ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा सहभाग करावा यासाठी निवीदा दाखल केली होती. २०२२ सालच्या राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद बर्मिंगहॅमला देण्यात आलेलं आहे.