Sri Lanka Former Captain Shot Dead in Front of Wife and Kids: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधारावर त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती श्रीलंकन माध्यमांनी दिली आहे. श्रीलंकेच्या माध्यमांनुसार, श्रीलंकेच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धम्मिका निरोशन (४१) याची मंगळवारी रात्री (१६ जुलै २०२४) गाले येथील अंबालांगोडा येथे त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मिका निरोशन त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपीला अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सध्या या गुन्ह्याचा कसून तपास सुरू आहे, मात्र या गुन्ह्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

हेही वाचा – Natasa Stankovic: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने लेकासह सोडलं घर, एअरपोर्टवरील VIDEO आला समोर

श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या

धम्मिका निरोशन हा सुरूवातीच्या काळात श्रीलंकेतील सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. त्याने २००१ ते २००४ दरम्यान गाले क्रिकेट क्लबसाठी १२ प्रथम श्रेणी सामने आणि ८ लिस्ट ए सामने खेळले, ३०० हून अधिक धावा केल्या आणि १९ विकेटही घेतले. त्याने २००० मध्ये श्रीलंकेच्या अंडर-१९ संघासाठी पदार्पण केले आणि दोन वर्षे अंडर-१९ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळले.

हेही वाचा – इंग्लिश क्रिकेटपटूच्या घरावर दोन वेळा हल्ला, शेवटी सोडावे लागले घर; CCTV कॅमेऱ्यात कैद झाला हल्ल्याचा VIDEO

धम्मिका निरोशनने १० सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या अंडर-१९ संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्त्वाखाली परवीझ महारूफ, अँजेलो मॅथ्यूज आणि उपुल थरंगासारखे खेळाडू खेळले आहेत. या सर्वांनी राष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. मात्र, धम्मिका निरोशनला संघासाठी खेळण्याती संधी मिळाली नाही. डिसेंबर २००४ मध्ये त्याने शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला.

हेही वाचा – VIDEO: “RCB म्हणजे फक्त कोहली, गेल आणि डिव्हिलियर्स…” पार्थिव पटेलचा गौप्यस्फोट, आरसीबीला जेतेपद का पटकावता आलं नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषक २०२४ मधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंकेचा संघ ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत विश्वविजेत्या भारतीय संघाविरूद्ध खेळताना दिसणार आहे. यामालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर वानिंदू हसरंगाने श्रीलंकेच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले.