Team India Squad For England Tour: आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे २५ मे ला होणारा अंतिम सामना आता ३० मे ला होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यामुळे भारतीय संघ ६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेपूर्वी भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या खेळाडूला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारत- इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्सच्या हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान माध्यमातील वृत्तानुसार, मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला या मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. शार्दुलचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार आहे. गेल्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने गोलंदाजीत आणि फलंदाजीतही दमदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीचा आणि अनुभवाचा भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर चांगलाच फायदा होऊ शकतो.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी दिली जाणार आहे. २०२३ नंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळालेली नाही. शार्दुलला २०१९ मध्ये वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने महत्वाची भूमिका बजावली. त्याला आतापर्यंत ११ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना ३१ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजीत ३३१ धावा कुटल्या आहेत.
इंग्लंडमध्ये कसा राहिलाय रेकॉर्ड?
इंग्लंड दौऱ्यासाठी शार्दुल ठाकूरची भारतीय संघात निवड करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, त्याचा इंग्लंडमध्ये ४ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव. या ४ कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने १० गडी बाद केले. तर फलंदाजीत १७३ धावा केल्या. ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी
भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर, त्याला पुन्हा कमबॅक करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली आहे. गेल्या २ वर्षांपासून तो भारतीय संघात कमबॅक करू शकलेला नाही. रणजी ट्रॉफीत त्याने ९ सामन्यांमध्ये ५०५ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकं झळकावली. यासह गोलंदाजी करताना त्याने ३५ गडी बाद केले.