टी २० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात काही फेरबदल केले आहेत. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे. केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. तर टी २० वर्ल्डकप संघातील काही खेळाडूंना आराम दिला गेला असून काही नविन खेळाडूंना संधी मिळाली आहे. विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला आहे. पुणेकर असलेल्या आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळालं आहे. ऋतुराज गायकवाडची आयपीएल २०२१ स्पर्धेत बॅट चांगलीच तळपली होती. हर्षल पटेल, वेंकटेश अय्यार यांना संघात स्थान मिळालंय. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तर श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झालं आहे. दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेत १६ सामन्यात एकूण ६३५ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजची नाबाद १०१ ही सर्वोत्तम खेळी आहे. या स्पर्धेत ऋतुराजने ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले होते. आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी तो ऑरेंज कॅपच मानकरी ठरला होता.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. महाराष्ट्र संघाने गोवा संघाविरुद्ध खेळताना नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत ३४ चेंडूत ४४ धावा केल्या. यात ६ चौकारांचा समावेश आहे. महाराष्ट्राने गोव्यासमोर विजयासाठी ३ बाद १७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. गोव्याचा संघ सर्वबाद १०४ धावाच करू शकला.

न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी कमी अवधी उरला आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत. करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. करोनामुळे आयपीएल आणि वर्ल्डकपचं आयोजनही युएईत करावं लागलं होतं.