टी-२० विश्वचषक २०२१च्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. आता टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत. या सामन्याबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भविष्यवाणी केली आहे. ''इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल'', असे अख्तरने म्हटले. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणार्या सामन्याबद्दल एएनआयशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, ''यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात आम्ही मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा भारताला हरवू. टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तान हा भारतापेक्षा चांगला संघ आहे. भारतीय मीडियाच आपल्या संघावर विनाकारण दबाव टाकत असतो, जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये दोन देशांचा सामना होतो, तेव्हा भारताचा पराभव होणे ही सामान्य गोष्ट आहे.'' हेही वाचा - एकच नंबर..! भारताची शफाली वर्मा पुन्हा ठरली सरस; वाचा ‘लेडी सेहवाग’नं नक्की केलं काय? २०२१च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसमोर एकही सामना गमावला नव्हता. भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग १२ सामने जिंकले होते, मात्र त्यावेळी पाकिस्तानला भारताचा पराभव करण्यात यश आले होते. पाकिस्तानने भारताचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विश्वचषकात भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने पाकिस्तानला टी-२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.