ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेत सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. मात्र आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली चांगलाच तळपला आहे. दरम्यान, भारताने चार गडी राखून हा सामना जिंकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा >>> IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवताच विराट कोहलीला झाले अश्रू अनावर

विराट कोहलीच्या वादळी खेळीमुळे भारताने चार गडी राखत पाकिस्तानला धूळ चारली. दिवाळीच्या मुहूर्तावर भारताने हा दणदणवीत विजय मिळवल्यामुळे देशातील नेत्यांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिवाळीला आता सुरुवात झाली, असे म्हणत टीम इंडियाची वाहवा केली. “टी-२० विश्वचषकाची ही योग्य सुरुवात आहे. दिवाळीला सुरवात झाली आहे. विराट कोहलीने अत्यंत उत्तम खेळ केला. भारताच्या पूर्ण संघाचे अभिनंदन,” असे अमित शाह म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनीदेखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “आजचा सामना फारच रोमहर्षक होता. दबाव असूनही भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. आगामी सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असा शुभेच्छा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> IND vs PAK Highlight: किंग कोहली इज बॅक! भारत विरुद्ध पाकिस्तानच्या शेवटच्या षटकात ‘असा’ रंगला थरार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय संघाला शुभेच्छा. सामन्याच्या शेवटच्या षटकात रोमहर्षक लढत झाली. क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात रोमहर्षक षटक होते. दिवाळीनिमित्त विराट कोहलीने भारतीयांना विजयरुपात भेट दिली आहे. सर्व भारतीय त्याचे आभारी आहेत,” असे शरद पवार म्हणाले आहेत.