आयपीएल स्पर्धेवर करोनाची पडछाया पडली आहे. त्यामुळे एक एक करुन परदेशी खेळाडू भारत सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आतापर्यंत आयपीएलचे २० सामने खेळले गेले आहेत. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील करोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. मात्र उर्वरित सामने होतील असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं पीटीआयला ही माहिती दिली आहे.

“आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

करोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सोडणार IPL स्पर्धा?

राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यु टाय, रायल चॅलेंजर्स बंगळुरुचे अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतलेल्या अँड्र्यु टायनं करोना स्थितीमुळे आणखी खेळाडू स्पर्धा सोडतील असा दावा केला आहे.

आयपीएलवर करोनाची पडछाया; आणखी दोन परदेशी खेळाडूंचा स्पर्धेला रामराम

आयपीएल स्पर्धेसाठी बायो बबल तयार केला आहे. मात्र भारतातील करोना स्थिती पाहता खेळाडू चिंतेत आहेत, असं कोलकाता नाइटराइडर्सचा मेंटॉर डेविड हसी याने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू अजूनही स्पर्धेत खेळत आहेत. या व्यतिरिक्त प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग, सायमन कॅटिच, समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लीजा स्टालेकर आहेत.