भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज म्हणजे मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी मॅक्लीन पार्क नेपियर येथे खेळला गेला.  टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ३ सामन्यांची टी२० मालिकेत १-० असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. न्यूझीलंडचा आजच्या सामन्यातील कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात आले होते. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने १६० ही सन्मानजनक धावसंख्या उभारली होती.

न्यूझीलंडने ठेवलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ईशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. ईशान आणि पंतने अनुक्रमे १० आणि ११ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडचा आजच्या सामन्यातील कर्णधार टीम साऊदीने २ गडी बाद केले. त्यानंतर भारताचा ‘द- स्काय’ सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी धुव्वाधार फलंदाजी करत पॉवर प्ले मध्ये ५७ धावा केल्या. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार बाद झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि शेवटी सामना तिथेच थांबविण्यात आला. नऊ षटकात ७६ धावांची गरज असताना टीम इंडियाच्या ७५ धावा झाल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला आणि १-०ने मालिका खिशात घातली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या त्या दोन खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ते दोन खेळाडू म्हणजेच डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स होय. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणत शेवटच्या पाच षटकात ३० धावांत तब्बल ८ गडी बाद केले. या दोघांच्या जोरावरच  न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये मालिका विजय संपादन केला.

न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक धावा चोपल्या. यावेळी त्याने ४९ चेंडूत ५९ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकारांचीही बरसात केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा १२०.४१ इतका होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स यानेही ३३ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा चोपल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्क चॅम्पमनने १२, डॅरिल मिचेलने १० आणि मिचेल सँटनरने १ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दोनच गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. दोघांनीही प्रत्येकी ४ गडी बाद करत आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला. डावखुरा गोलंदाज अर्शदीपने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले. त्याला, हर्षल पटेल याने १ गडी बाद करत मोलाची साथ दिली.