पीटीआय, चेंगडू (चीन)

ईशाराणी बरुआ आणि अनमोल खरब या प्रतिभावान युवा खेळाडूंच्या शानदार खेळाच्या जोरावर भारताच्या नवोदित महिला बॅडमिंटन संघाने सलग दुसऱ्या विजयासह उबर चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात रविवारी भारतीय महिला संघाने अ-गटातून सिंगापूरचा ४-१ असा पराभव केला.

आशियाई विजेत्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात शनिवारी कॅनडावर मात केली होती. त्यानंतर आपली दर्जेदार कामगिरी त्यांनी सिंगापूरविरुद्धही सुरू ठेवली. अश्मिता चलिहाला सिंगापूरविरुद्ध पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर अन्य खेळाडूंनी आपला खेळ उंचावून भारताचा विजय साकार केला. युवा आणि अननुभवी असूनही भारतीय महिला खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेचे यथार्थ दर्शन घडवले. गटातील अन्य लढतीत चीनने कॅनडाचा ३-० असा पराभव केला. सलग दोन विजयांनंतरही भारत अ-गटात चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा >>>CSK vs SRH : गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात

पहिल्या दिवशी कॅनडाच्या मिशेल लीचे आव्हान परतवणाऱ्या अश्मिताला रविवारी जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावर असणाऱ्या येओ जिया मिनकडून १५-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, दुहेरीत राष्ट्रीय विजेत्या प्रिया कोंजेगबाम आणि श्रुती मिश्रा जोडीने सिंगापूरच्या शिआओ एन हेंग-जीन यु जिया जोडीवर २१-१५, २१-१६ असा विजय मिळवून भारताला बरोबरी साधून दिली. पाठोपाठ ईशाराणीने दुसरी एकेरीची लढत इन्सिरा खानविरुद्ध २१-१३, २१-१६ अशी जिंकून भारताला आघाडीवर नेले.

दुसऱ्या दुहेरीत सिमरन सिंघी-रितिका ठाकेर जोडीने अगदी सहजपणे यी टिंग एल्सा-झ्ॉन मिशेली जोडीचे आव्हान २१-८, २१-११ असे संपुष्टात आणून भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या लढतीत अनमोलने सिंगापूरच्या ली शिन मेगनचा २१-५, २१-१३ असा पराभव करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(ईशाराणी बरुआ)