India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दबावाखाली खेळल्याबद्दल केएल राहुलचे कौतुक केले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने १३वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीनंतर केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. केएल राहुल ७५ धावा करून नाबाद राहिला. केएल राहुलने रवींद्र जडेजासोबत १३१ चेंडूत १०८ धावांची नाबाद भागीदारी केली. अशाप्रकारे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत संघाने १-० अशी आघाडी घेतली. व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलची केलेली स्तुतीसुध्दा चर्चेत आहे. कारण यापूर्वी त्यांनी केएल राहुलवर जोरदार टीका केली होती. केएल राहुलबाबत व्यंकटेश प्रसाद यांचा आकाश चोप्रासोबत सोशल मीडियावर ‘मतभेद’ झाले होते. व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलच्या आकडेवारीचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. केएल राहुलवर टीका केल्यानंतर आता व्यंकटेश प्रसाद यांनी मुंबईतील कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले आहे. व्यंकटेश प्रसाद म्हणाले की, केएल राहुलने दबावाखाली उत्कृष्ट संयम राखला आणि शानदार खेळी खेळली. व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'दबावाखाली उत्कृष्ट संयम आणि केएल राहुलकडून शानदार खेळी. अव्वल खेळी. रवींद्र जडेजाची चमकदार साथ आणि भारताचा शानदार विजय.' व्यंकटेश प्रसाद यांनी यापूर्वी केएल राहुलच्या कामगिरीबद्दल आणि प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या निवडीबद्दल अनेक टीका टिप्पणी केली होती. यासंदर्भात त्यांनी अनेक ट्विट केली होती. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, केएल राहुलचा संघात समावेश केल्याने इतर प्रतिभावान लोकांना संधी मिळत नाही. व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर केएल राहुलबाबत अनेक पोस्ट केल्या आहेत - व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते की, 'भारतीय क्रिकेटच्या किमान गेल्या २० वर्षांमध्ये कोणत्याही टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने इतक्या कमी सरासरीने इतके कसोटी सामने खेळले नाहीत. त्याच्या समावेशामुळे प्रतिभावान खेळाडूंना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. फॉर्ममध्ये राहणाऱ्या लोकांना अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.' हेही वाचा - IND vs AUS 1st ODI: विराट कोहलीने लाइव्ह सामन्यात नाटू-नाटू गाण्यावर धरला ठेका; पाहा VIDEO ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ५व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतासाठी महत्त्वाच्या वेळी आपले अर्धशतक झळकावले. केएल राहुल फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या ४ विकेट्सवर ३९ अशी होती. तोपर्यंत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर शुबमन गिल आणि इशान किशन पॅव्हेलियनमध्ये परतले होते.