भारतीय संघाचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती घेतल्याचा अनेकांना धक्का बसला आहे. विराट कोहलीचा कसोटीमधील रेकॉर्ड कायमचं कमालीचा राहिला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडविरूद्ध सामन्यांमध्ये तर कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. पण आता कसोटीमध्ये विराट यापुढे खेळताना दिसणार नाहीये. यादरम्यान नव्या रिपोर्टमध्ये विराटने भारताच्या दिग्गज माजी खेळाडूशी चर्चा करत कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली.
विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती का जाहीर केली, असा प्रश्न सर्वांना पडला असतानाच एक रिपोर्ट समोर आला आहे.
निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना भेटला नव्हता. त्याने त्याच्या जवळच्या वरिष्ठ आणि दिग्गज खेळाडूशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.
विराट कोहली बऱ्याच काळापासून कसोटी निवृत्तीचा विचार करत होता. त्याचा फॉर्म, दौऱ्यांवर खेळाडूंच्या कुटुंबांसाठी बीसीसीआयचे कडक नियम, भारतीय निवडकर्त्यांची नवी संघबांधणीची योजना ही कोहलीच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम देण्यामागील मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे, कारण तो १०००० धावांपासून फक्त ७५२ धावा मागे होता. कोहलीच्या निवृत्तीमागील खरी कारण आपल्याला किमान सध्या तरी निश्चितपणे कळणार नाहीत, कारण त्याने, भूतकाळातील भारतीय क्रिकेटमधील इतर दिग्गजांप्रमाणे या निर्णयाचे कारण आपल्यापुरतेच सीमित ठेवले असावे.
क्रिकेट विश्वात असा एक माणूस आहे, ज्याला कोहली एखादा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासात घेत असे. कोहलीने कसोटीला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेण्यापूर्वी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी बोलल्याचे वृत्त समोर आले आहे. “निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी कोहलीने त्याचा मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्याचे समजते,” असा दावा क्रिकबझच्या वृत्तात करण्यात आला आहे.
विराट आणि रवी शास्त्री यांचं कॅप्टन-कोच बॉन्डिंग आपल्या सर्वांनाच माहित आहे. विराटने शास्त्रींशी याविषयी चर्चा करणं नक्कीच आश्चर्यकारक नाही कारण जेव्हा विराट कसोटी कर्णधार होता तेव्हा मुख्य प्रशिक्षक हे रवी शास्त्री होते आणि दोघांमधील बॉन्डिंग कमालीचं होतं. शास्त्री आणि कोहलीच्या काळामध्ये भारतीय संघ एक उत्कृष्ट कसोटी संघ म्हणून उदयास आला आणि तीन वर्ष भारताच्या कसोटी संघाचा दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला.
क्रिकबझच्या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की विराट कोहलीला बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे तो इंग्लंड मालिकेपर्यंत निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलू शकला असता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि माजी बीसीसीआय सचिव जय शाह यांना भेटणार होता. पण भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आणि नंतर ही बैठक होऊ शकली नाही. जर ही बैठक झाली असती तर विराट कोहली कदाचित इंग्लंड दौऱ्यावर गेला असता आणि त्याचे १० हजार कसोटी धावांचे स्वप्नही पूर्ण झाले असते.