सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३३ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ७ गडी राखत भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन तर इश सोधीने १ बळी घेतला, मात्र भारतीय फलंदाजांवर अंकुश लावण त्यांना जमलं नाही.

अवश्य वाचा – Ind vs NZ : असं काय घडलं की विराटवर आली तोंड लपवण्याची वेळ…

भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर विराट यष्टीरक्षक सेफर्टकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि शिवम दुबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून लोकेश राहुलने नाबाद ५७ तर श्रेयस अय्यरने ४४ धावा केल्या.

अवश्य वाचा – Ind vs NZ : विराट कोहलीचा रोहित शर्माला धोबीपछाड

विजयानंतर बोलत असताना विराट कोहलीने आगामी सामन्यासाठी आपली रणनिती सांगितली. “पहिल्या दोन सामन्यात याच खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही संघात बदल होतील असं वाटत नाही. आजच्या सामन्यात सर्वांनी चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडचा संघ पुढच्या सामन्यांमध्ये पुनरागमन करेल यात शंकाच नाही. मात्र आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत.” सामना संपल्यानंतर Match Presentation Ceremony मध्ये विराट बोलत होता. या मालिकेतला तिसरा सामना २९ जानेवारीला हॅमिल्टनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : विराटसेनेने गाजवलं ऑकलंडचं मैदान, अनोखी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ