Virat Kohli Announces Test Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून ओळख असलेला विराट कोहली आता कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार नाही. विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने बीसीसीआयला आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिल्याची बातमी समोर आली होती. पण आता विराटच्या घोषणेने ही बातमी खरी असल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विराटने एका कार्यक्रमात निवृत्तीबाबत वक्तव्य केलं होतं, जे आता खरं ठरलं आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ विराट कोहलीसाठी फारशी चांगली मालिका ठरली नाही. ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विराट कोहलीने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याला एकाही सामन्यात मोठी धावसंख्या करता आलेली नव्हती. परिणामी भारताला या मालिकेत पराभवाचा फटका बसला. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेनंतर या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीबाबत चर्चा होती.
विराट आणि रोहितच्या खराब कामगिरीचा संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी दौऱ्यावर मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला. भारताने दशकभरानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली होती. यानंतर बीसीसीआयने नवे नियमही जाहीर केले होते. पण आता इंग्लंडविरूद्ध दौऱ्यापूर्वी भारतीय संघाच्या या दोन्ही दिग्गजांनी कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे.
विराट कोहली १५ मार्चला आयपीएलच्या १८व्या हंगामासाठी त्याच्या फ्रेंचायझी बेंगळुरूमध्ये सामील झाला होता. तेव्हा फ्रँचायझीच्या एका कार्यक्रमात कोहलीने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्याच्या अलीकडच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनशेहून अधिक धावा करणारा विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून फक्त एकच शतक पाहायला मिळाले. पण यापूर्वी कसोटीमध्ये विराटचा ऑस्ट्रेलियामधील रेकॉर्ड कमालीचा आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ या संपूर्ण दौऱ्यात कोहली ऑफ-स्टंपबाहेरील चेंडूंवर वारंवार आऊट होत राहिला, ज्यामुळे केवळ चाहतेच नाही तर तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटले. त्यामुळे कोहलीला त्या दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याच्या संघर्षाबद्दल विचारले असता, विराट कोहली म्हणाला, “मी कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळू शकणार नाही, त्यामुळे यापूर्वी जे घडलं जी कामगिरी मी करू शकलो, त्यात समाधानी आहे.” टीम इंडियाचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा २०२७ च्या अखेरीस होणार आहे.
आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर विराटची संघात निवड होईल का? निवड झाल्यास या मालिकेनंतरच निवृत्ती घेणार का? अशा वेगवेगळ्या चर्चा पूर्वीपासूनच सुरू होत्या, पण विराटच्या निवृत्तीच्या घोषणेने कसोटी क्रिकेटमधील एका पर्वाचा अंत झाल्याचे म्हटले जात आहे.