वृत्तसंस्था, बडोदा

सलामीची फलंदाज स्मृती मनधानाची (१०२ चेंडूंत ९१ धावा) अप्रतिम खेळी आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरच्या (५/२९) भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघाचा २११ धावांनी धुव्वा उडवला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद ३१४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना विंडीजने सुरुवातीपासूनच गडी गमावले. अखेरीस विंडीजचा डाव २६.२ षटकांत १०३ धावांवरच आटोपला. रेणुकाने एकदिवसीय कारकीर्दीत प्रथमच सामन्यात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. तिच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

त्याआधी, डावखुरी फलंदाज मनधानाने भक्कम पाया रचून दिल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी त्यावर तीनशे धावांचा डोंगर उभा केला. मनधाना आणि पदार्पण करणाऱ्या प्रतिका रावल (६९ चेंडूत ४०) यांनी ११० धावांची सलामी दिली. मनधनाने सलग पाचव्या डावात ५० हून अधिक धावांची खेळी केली. ती बाद झाल्यावर हरलीन देओल (५० चेंडूंत ४४), कर्णधार हरमनप्रीत कौर (२३ चेंडूंत ३४), जेमिमा रॉड्रिग्ज (१९ चेंडूंत ३१) आणि रिचा घोष (१३ चेंडूंत २६) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा >>>Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची हिंदीत उत्तरं आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचा संताप, नेमकं काय घडलं?

विक्रमी विजय अन् पराभव

भारताने २११ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा हा दुसरा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने २०१७ मध्ये आर्यलंडवर २४९ धावांनी मात केली होती. वेस्ट इंडिज महिला संघाचा हा धावांच्या फरकाने सर्वांत मोठा पराभव ठरला. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांना इंग्लंडकडून २०८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद ११७ (जी. त्रिशा ५२; मिथिला विनोद १७; फरजाना इसमिन ४/३२) विजयी वि. बांगलादेश : १८.३ षटकांत सर्वबाद ७६ (जुएरिया फिरदौस २२; आयुषी शुक्ला ३/१७, सोनम यादव २/१३, पारुनिका सिसोदिया २/१२).