Virat Kohli Post Retirement Plan: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत त्याने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ही मोठी घोषणा करण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच विराटने आपल्या निवृत्ती नंतरच्या योजनांबाबत खुलासा केला होता.
विराट कोहली हा गेल्या काही वर्षांत सर्वात व्यस्त क्रिकेटपटूंपैकी एक होता. कारण तो तिन्ही प्रारूपात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत होता. टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ असणार आहे. भारतीय संघाचे सामने नसताना तो आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या इनोव्हेशन लॅब समिटमध्ये बोलताना त्याने आपल्या निवृत्ती नंतरच्या योजनांबाबत खुलासा केला होता. याबाबत बोलताना तो म्हणाला होता की, ” निवृत्तीनंतर मी काय करणार आहे हे मला खरंच माहित नाही. मी माझ्या संघ सहकाऱ्याला देखील हाच प्रश्न विचारला होता आणि मलाही हेच उत्तर मिळालं होतं. हो, पण खूप प्रवास करायचा आहे.”
यासह आणखी एका मुलाखतीत विराटला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळीही त्याने निवृत्तीचे संकेत देत म्हटले होते की, “मी निवृत्ती घेतली, की मी निघून जाईल. काही काळासाठी तुम्हाला दिसणार नाही ( हसत म्हणाला). त्यामुळे जोपर्यंत मी खेळत आहे, तोपर्यंत मी माझं सर्वस्व देणार आहे. हिच एक गोष्ट आहे, जी मला पुढे जाण्यास प्रेरणा देते.” यावरून हे स्पष्ट होत आहे की, निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पुन्हा एकदा लंडनला जाऊ शकतो. कारण क्रिकेटमधून विश्रांती मिळाल्यानंतर तो अनेकदा लंडनमध्ये दिसून आला आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेने यांनी देखील, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनला जाण्याचा विचार करत असल्याचे उघड केले. एका पॉडकास्टमध्ये बोलताना नेने यांनी सांगितले की, “अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनला जाण्याचा विचार करत होते. कारण इथे ते जे काही करतात ते सर्वांचं लक्ष वेधून घेतं. त्यामुळे इथे त्यांना मिळालेल्या यशाचा आनंद घेता येत नव्हता. विराट आणि अनुष्का खूप चांगले आहेत. त्यांना आपल्या मुलांना सर्वसामान्य आयुष्य द्यायचं आहे.”