Indian Team Stats in Dharamshala : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुरुवार, ७ मार्चपासून धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी चार सामन्यानंतर मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतल्यानंतर, भारत आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता भारत धरमशाला येथे होणारा पाचवा सामना जिंकून आपले अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. धरमशाला येथील मैदानावर आतापर्यंत एकच कसोटी सामना खेळला गेला आहे. या मैदानावर भारताने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळली होती. याशिवाय भारताने मैदानावर तीन टी-२० (दोन विजय, एक पराभव) आणि पाच एकदिवसीय सामने (तीन विजय, दोन पराभव) खेळले आहेत. या ठिकाणी भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. या सामन्यात मेन इन ब्लूने चार गडी राखून विजय मिळवला. या मैदानावर इंग्लंड प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. धर्मशाला येथे झालेल्या कसोटी सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन कसोटी सामन्यांनंतर १-१ बरोबरीत होते. तत्कालीन कर्णधार विराट कोहली सामन्यातून बाहेर पडल्याने यजमान संघाला मोठा फटका बसला होता. अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून पहिली कसोटी खेळत होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने मालिकेतील तिसरे शतक झळकावले. मात्र, स्मिथला त्याच्या सहकाऱ्यांची फारशी साथ मिळाली नाही. हेही वाचा - IND vs ENG : पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर! ऑली रॉबिन्सनच्या जागी ‘या’ खेळाडूचे पुनरागमन भारताने मालिका २-१ ने जिंकली - नवोदित कुलदीप यादवने चार विकेट घेतल्याने भारताने ऑस्ट्रेलियाला ३०० धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांमुळे भारताने ३२ धावांची आघाडी घेतली. या डावात नॅथन लायनने पाच विकेट्स घेतल्या. यानंतर भारताच्या दिग्गज गोलंदाजांवर संघाची जबाबदारी होती. त्यावेळी उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १३७ धावांवर आटोपला. यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुरुवातीला दोन गडी गमावले होते, त्यानंतर कर्णधार रहाणे आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावत संघाला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला. अशा प्रकारे भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप. पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: झॅक क्रॉऊली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन