मोन्ग कोक (हाँगकाँग) : श्रेयंका पाटीलच्या (दोन धावांत पाच बळी) उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी हाँगकाँगचा नऊ गडी आणि ८८ चेंडू राखून धुव्वा उडवत उदयोन्मुख महिला आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगला १४ षटकांत ३४ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने हे लक्ष्य ५.२ षटकांतच एका गडय़ाच्या मोबदल्यात गाठले. कर्णधार श्वेता सेहरावत (२) लवकर बाद झाली. मात्र, उमा छेत्री (१५ चेंडूंत नाबाद १६) आणि त्रिशा गोंगडी (१३ चेंडूंत नाबाद १९) यांनी भारताला विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, ऑफ-स्पिनर श्रेयंकासमोर हाँगकाँगची फलंदाजी फळी ढेपाळली. महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या २० वर्षीय श्रेयंकाने अचूक टप्प्यावर मारा करताना हाँगकाँगचा निम्मा संघ गारद केला. तिला डावखुरी फिरकी गोलंदाज मन्नत कश्यप (२/२) आणि लेग-स्पिनर पार्शवी चोप्रा (२/१२) यांची मोलाची साथ लाभली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयोन्मुख महिला आशिया चषकातील भारताचा पुढील सामना गुरुवारी नेपाळविरुद्ध होणार आहे.